उपराजधानीच्या वल्गना, मात्र प्रत्यक्षात अवहेलना : स्पाईस जेट सेवा बंद करण्याच्या तयारीत
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र राजकीय दबावापोटी विमानसेवा बंद करण्याचा प्रकार घडत आहे. स्पाईस जेट या विमान कंपनीच्या बेळगाव फेऱ्यांना आता घरघर लागली आहे. यापूर्वी बेंगळूर व मुंबई या फेऱ्या बंद केल्यानंतर 10 डिसेंबरनंतर दिल्ली फेरीही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या विमानफेऱ्या बंद करून त्या हुबळीला हलविण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. प्रवाशांची संख्या वाढली असतानाही विमानफेरी का बंद करण्यात येत आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
स्पाईस जेट ही कंपनी बेळगावमधून मागील अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. मुंबई, बेंगळूर त्यानंतर नवी दिल्ली या शहरांना विमानफेरी सुरू करून स्पाईसने बेळगावचा संपर्क देशाच्या महत्त्वाच्या शहरांना जोडला होता. मागील तीन ते चार महिन्यांपर्यंत या सर्व विमानफेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर मात्र तांत्रिक कारणे देत एकेक विमानफेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेळगाव-बेंगळूर ही विमानफेरी स्पाईसने कायमची रद्द केली होती. यावर प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
बेळगावहून मुंबईला जाण्यासाठी स्पाईस जेट दररोज सेवा देत होते. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत होते. असे असताना ही विमानफेरीही मागील काही दिवसांपासून रद्द करण्यात आली आहे. त्यातच आता बेळगाव-दिल्ली ही सर्वात महत्त्वाची विमानफेरीही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीसह एअरमन टेनिंग अॅपॅडमी, फाऊंड्री उद्योग, एकस यासारख्या कंपन्या असल्याने दिल्ली विमानफेरी महत्त्वाची होती. परंतु, तीदेखील रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
चाळीस कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
स्पाईस जेटने बेळगावमध्ये उत्तम व्यवसाय केला आहे. त्यामुळेच बेळगाव विमानतळावर स्पाईस जेटचे 40 हून अधिक कर्मचारी आहेत. आता विमानसेवेला घरघर लागल्याने कर्मचारीही अडचणीत सापडले आहेत. जर विमानफेरी कायमची बंद झाल्यास या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. अधिक तर कामगार हे बेळगाव परिसरातीलच असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या विमानफेऱ्या बंद करून त्या हुबळीला हलविण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बेळगावमधून दररोज शंभरहून अधिक प्रवासी दिल्लीला जात होते. तर दिल्लीहून तितकेच प्रवासी बेळगावला येत होते. त्यामुळे मागील वर्षभरात दिल्ली विमानफेरीला उत्तम प्रतिसाद होता. मागील आठवड्यात हुबळी-दिल्ली ही विमानफेरी सुरू झाली. तेव्हापासून बेळगावच्या विमानफेरीला घर घर लागली आहे. बेळगाव विमानतळाचे महत्त्व कमी करून हुबळी विमानतळाला महत्त्व मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. असे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र बेळगावमधील कोणताही लोकप्रतिनिधी याविरोधात आवाज उठविण्यास तयार नाही. विमानसेवेमुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला असल्याने राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे विमानसेवा बंद होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या सेवा शेजारील हुबळी-धारवाडला
बेळगाववर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून सुवर्ण विधानसौधची निर्मिती करत उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. परंतु, हा केवळ नावापुरताच राहिला. कारण, नावाला उपराजधानी असली तरी सर्व महत्त्वाच्या सेवा मात्र शेजारील हुबळी-धारवाड या शहरांना मिळत आहेत. मागील दोन वर्षांत कोणतीही नवीन रेल्वे अथवा विमानफेरी बेळगावच्या वाट्याला आलेली नाही. असे असताना हुबळीला मात्र नवीन विमानफेऱ्या, नवीन एक्स्प्रेस वरचेवर देण्यात येत आहेत. यामुळे बेळगावात सुरू झालेल्या भाषावादाचा धसका घेऊन सरकार बेळगावला सुविधा उपलब्ध करून देण्यात माघार घेत आहे का? असा प्रश्न जनतेच्या मनात उभा ठाकला आहे.
विमानसेवा बंद करण्याचा प्रकार
बेळगावमधून दोन ते तीन वर्षांपूर्वी 13 ते 14 शहरांना थेट विमानसेवा सुरू होती. यामुळे महिन्याला जवळपास 40 हजार प्रवासी विमान प्रवास करत होते. मात्र, कोरोनाचे कारण देत अनेक विमानफेऱ्या मागील काही वर्षात बंद करण्यात आल्या आहेत. ट्रू जेट कंपनीने आपली सेवा बंद केल्यानंतर हैद्राबाद, कडप्पा, म्हैसूर व तिऊपती या शहरांची विमानसेवा बंद झाली. इंडिगो कंपनीने बेळगाव-चेˆई सुरू केलेली विमानफेरी दोनच महिन्यात बंद केली. नोव्हेंबर महिन्यात बेळगाव-पुणे ही विमानफेरी अलायन्स एअरने मागे घेतली.