लेखा खात्यात अडतात घोडे : उच्चपदस्थ अधिकाऱयाची माहिती
प्रतिनिधी /पणजी
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वयोवृद्ध, विधवा तसेच दिव्यांग लाभधारकांना मिळणारे पैसे गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून हे पैसे लवकरच त्यांना देण्यात येतील, अशी माहिती समाज कल्याण खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने दिली आहे.
या योजनेंतर्गत राज्यात सुमारे 1.38 लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक आधार देण्यात येतो. त्याद्वारे दरमहा सुमारे 27 कोटी रुपये वितरित करण्यात येतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तमाम लाभधारक या पैशांची आतुरतेने वाट पहात आहेत आणि समाज कल्याण खाते लेखा संचालनालयाकडून मंजुरीची वाट पहात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सदर अधिकाऱयाने सांगितले.
लाभार्थ्यांना पैसे वेळच्यावेळी मिळावे यासाठी खाते प्रयत्नरत असते. त्यादृष्टीने नुकतीच खात्यातील अधिकाऱयांची बैठक घेऊन आढावाही घेण्यात आला. ’आम्ही आमच्यावतीने वेळेवर सर्व सोपस्कार करून फाईल लेखा खात्यात पाठवतो. परंतु तेथे निधी मंजूर करताना अन्य खात्यांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात येतो. त्यामुळे आमच्या फाईलला मंजुरी मिळण्यात विलंब झाला, असे सदर अधिकारी म्हणाला.
सदर प्रकरण आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे लावून धरले असून लवकर निधी मंजूर करण्यासंबंधी लेखा खात्याला सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर लवकरच सर्वाना व्यवस्थितरित्या पैसे मिळतील अशी आशा सदर अधिकाऱयाने व्यक्त केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही याप्रश्नी सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले होते. या लाभधारकांना पैसे वेळच्यावेळी मिळावे यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करण्यात येणार असून त्यानंतर कितीही आर्थिक टंचाई असली तरीही या लाभधारकांना विनाव्यत्यय पैसे मिळत राहतील, असे फळदेसाई यांनी सांगितले होते. तसेच जास्त वयस्क, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना वारंवार बँकेत खेपा माराव्या लागू नयेत यासाठी त्यांचे पैसे घरपोच देण्याचाही विचार त्यांनी बोलून दाखवला होता.
त्यादृष्टीने लवकरच सरकारी सेवकांच्या मदतीने राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याद्वारे अद्याप नोंदणी न झालेल्यांचा शोध घेऊन त्यांनाही सामाजिक सुरक्षा किंवा आरोग्य विमा योजनेंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. असेही फळदेसाई यांनी सांगितले होते.