वितरणाचे काम ठप्प : रेशनपासून लाभार्थी वंचित, चालना देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून नवीन अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डचे वितरण थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे नवीन बीपीएल रेशनकार्डच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी, अशी मागणी कार्डधारकांतून होत आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना अंत्योदय व बीपीएल कार्डचे वितरण केले जाते. मात्र या कामामध्ये सातत्य नसल्याने लाभार्थ्यांना कार्डपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे दरमहा मिळणाऱ्या रेशनपासूनदेखील दूर रहावे लागत आहे. बीपीएल कार्डसाठी हजारो लाभार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. मात्र कार्ड वितरणाचे काम ठप्प झाल्याने रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारने मोफत रेशनचा पुरवठा सुरू केला आहे. केंद्राकडून 5 आणि राज्य सरकारकडून 5 किलो असा एकूण 10 किलो तांदूळ मानसी वितरित केला जात आहे. मात्र लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड नसल्याने या अतिरिक्त धान्यापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे अर्ज केलेले लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
बीपीएल कार्ड मिळत नसल्याने गैरसोयींचा सामना
मागील दोन वर्षांपासून रेशनकार्ड वितरणाचे काम विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अर्ज करून सहा महिने उलटले तरी अद्याप अर्जदारांना रेशनकार्ड उपलब्ध झाले नाही. त्यामुळे रेशनकार्ड कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थ्यांतून विचारला जात आहे. शासकीय, वैद्यकीय आणि इतर सुविधांसाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना वेळेत बीपीएल कार्ड मिळत नसल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी काही दिवस बीपीएल कार्ड वितरणाचे काम सुरू झाले होते. मात्र काही दिवसातच ते बंद झाले आहे. त्यामुळे बीपीएल कार्डासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा वाढली आहे.
शासनाच्या आदेशानंतर रेशनकार्ड वितरण
मागील काही दिवसांपासून नवीन बीपीएल कार्डचे काम ठप्प झाले आहे. जिल्ह्यातून नवीन बीपीएल कार्डसाठी 30 हजारहून अधिक अर्ज आले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर रेशनकार्ड वितरणाचे काम सुरू होणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खाते सहसंचालक)