औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी :
माझ्याशी गद्दारी केली. किमान शेतकऱ्यांशी तरी गद्दारी करू नका. पंचनामे होतील तेव्हा होतील, आधी ओला दुष्काळ जाहीर करा, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर रविवारी निशाणा साधला.
परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावांना भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर शेतकऱ्यांनीही ठाकरे यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.
ठाकरे म्हणाले, शेतात किती पाऊस पडावा, असे मुख्यमंत्री म्हणू शकतात. आपत्ती आपल्या हातात नसते. मात्र, या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. कारण शेतकऱ्यांना मदत करणे, हे सरकारचे काम आहे. शेतकऱ्यांची इतकी मोठी हानी होऊनही कुणीही त्यांच्या सहकार्यासाठी पुढे आले नाही. हे उत्सवी सरकार आहे. फक्त उत्सव करणे, एवढाच त्यांचा प्राधान्यक्रम आहे. उत्सव साजरे करण्यात काही हरकत नाही. मात्र, परिस्थिती काय आहे, ते पहा. 50 हजार हेक्टरी मदतीची शेतकऱ्यांची मागणी आहे. तीच मागणी आम्ही करू. पंचनामे होतील तेव्हा होतील. परंतु, आधी ओला दुष्काळ जाहीर करा. तुम्ही आमच्याशी गद्दारी केलीत, इथवर ठीक आहे. पण, शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. ती आम्ही कदापि सहन करणार नाही. शेतकऱ्यांनीही प्रसंग कठीण असला, तरी यात धीर सोडू नये. सरकारला मदत करण्यासाठी आम्ही भाग पाडू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
अधिक वाचा : शेअर बाजारात आज एक तास मुहूर्त ट्रेडिंग
शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो, तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. अशा कठीण समयात शेतकऱ्याला उघडय़ावर पडू द्यायचे नाही, ही सरकारची जबाबदारी असते. परंतु, आज केवळ घोषणांची अतिवृष्टी सुरू असून, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. मुळात या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. ऐन दिवाळीत सरकार व्यस्त आहे. त्यांना शेतकऱ्यांकरिता वेळ नाही. मात्र, शिवसेना तुमच्यासोबत आहे. महाविकास आघाडीदेखील तुमच्यासोबत आहेत. आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका. आसूड तुम्हीच उगारा. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडा, असे आवाहन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
शेतकऱ्यांचे दिवाळे निघालेय
आजची माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. दिवाळी साजरी करणे तर सोडून द्या. पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिजवायचे, हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. केवळ विरोधी पक्षात आहेण् म्हणून मी येथे आलेलो नाही. तर या शेतकऱ्यांचे ऋण आपल्या सर्वांवर आहे. नेहमीच असते. महाविकास आघाडीच्या काळात साधारण दोन-अडीच वर्षे कोरोनात गेली. लॉकडाउन असताना आपल्या अर्थव्यवस्थेला जर कोणी आधार दिला असेल, तर आपल्या अन्नदात्याने, कृषी क्षेत्राने दिला. शेतकरी तेव्हा राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचेही दिवाळे निघाले असते, अशा शब्दांत ठाकरे यांनी बळीराजाचे कौतुक केले.