पंधरा दिवसांत 15 ते 20 घटना : मालमत्ता-वृक्षांचे नुकसान : उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने सतर्कता आवश्यक
बेळगाव : मागील 15 दिवसांत शहरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. 15 ते 20 ठिकाणी आग लागून मालमत्ता आणि वृक्षांची मोठी हानी झाली आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. शिवाय अग्निशमन दलाची जबाबदारीही आता वाढली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर आगीच्या घटनांमध्ये वाढ होते. शहराच्या विस्तारात झपाट्याने वाढ झाली आहे. शहरात विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील कुवेंपूनगर, कणबर्गी रोड-नंदिनी डेअरी, व्हॅक्सिन डेपो आदी ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: यामध्ये शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. यामध्ये फळा-फुलांच्या आणि शोभिवंत झाडांचादेखील समावेश आहे. त्यामुळे आता झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर येवू लागला आहे.
मागीलवर्षी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसामुळे आगीच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र यंदा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणी आगीची प्रकरणे सामोरी येवू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्ता सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान अग्निशमन दल तत्परता दाखवून वेळीच दाखल होत असल्याने काही प्रमाणात हानी टळू लागली आहे. शहरात केवळ आठवड्याभरात 15 ते 20 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. शिवाय अग्निशमन दलाची झोप उडाली आहे. एका दिवसांत तीन ते चार ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाची धावपळ उडाली आहे. शिवाय एकाचवेळेला लागलेल्या आगींवर नियंत्रण आणताना अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही आता सावध होणे आवश्यक आहे.
नागरिकांनी सावधता बाळगणे गरजेचे
मागील पंधरा दिवसांत शहरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. जवळजवळ 15 ते 20 घटना घडल्या आहेत. नागरिकांनी सावधता बाळगणेही आवश्यक आहे. एकाचवेळेला घटना घडू लागल्याने आव्हान निर्माण होत आहे. मात्र घटनास्थळी तातडीने दाखल होऊन नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-व्ही. एस. टक्केकर, अग्निशमन दलाचे अधिकारी