बावचीतील शेतकऱ्यांची बाजार समितीकडे तक्रार, जादा दराचे अमिष दाखवून केली फसवणूक
प्रतिनिधी/सांगली
मार्केट यार्डातील हळद व्यापाऱयाने वाळवा तालुक्यातील बावची येथील दहा शेतकऱ्यांना सुमारे बारा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एस. बी. पाटील रा. धामणी असे फसवणूक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या व्यापाऱ्याने बाजारभावापेक्षा एक हजार रुपये जादा देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादित करून शेतकऱ्यांना चुना लावला आहे. व्यापारी फोन लावला तरी तो उचलला जात नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून थेट बाजार समितीमध्ये येवून व्यापाऱ्याविरोधात तक्रार केली आहे.
वाळवा तालुक्यातील बावची येथील हळद उत्पादक शेतकऱयांनी उत्पादित झालेली हळद सांगली येथील व्यापारी एस. बी. पाटील यांना दिली होती. सध्या बाजारात नऊ ते साडेनऊ हजार रुपये क्विंटलला भाव आहे. परंतु पाटील या व्यापाऱ्यांने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन बाजारभावापेक्षा एक हजार रुपये जादा दर देतो, असे सांगत काही शेतकऱयांची हळद खरेदी केली. प्रारंभी हळदीचे संपूर्ण पेमेंट करण्यात आले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा संबंधित व्यापाऱयावर विश्वास बसला. बाजारापेक्षा जादा दराने हळदीला दर मिळत असल्याने त्या व्यापाऱयास हळद देण्याचा निर्णय घेतला. थेट शेतात जावून हळद पाहून दर निश्चित केला. तेथील सुमारे दहा ते बारा शेतकऱयांनी पाटील यांना हळद विक्री केली आहे.
शेतकरीत राणी बंडू बामणे यांची अठरा क्विंटल हळद खरेदी केली, त्यांना एक लाख 97 हजाराचा धनादेश दिला होता. मात्र धनादेश वटला नाही. नामदेव धोंडी बामणे यांचे एक लाख रुपये, सयाजी शिंदे यांचे 35 हजार, सुभाष कांबळे यांचे एक लाख 65 हजार रुपयांचे बिल प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले. ठरलेल्या वायद्याप्रमाणे संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱयांचे बिल दिले नाही. त्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने धनादेश देऊन फसवणूकच आहे. दिलेले धनादेश बाउन्स झाले असून त्यानंतर वेळकाढूपणा करीत पुढील वायदे देऊन फसवणूक केली आहे. संबंधित हळद व्यापाऱयाने सांगली बाजार समितीकडे परवाना घेतला आहे. परंतु बावचीमध्ये जावून शेतकऱयांनी हळद घेतली. आता शेतकऱयांनी फोन केले तर उचलत नाही. पैसे मिळत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.
मार्केट यार्डात शेतमाल विक्रीस आणावा- महेश चव्हाण
शेतकऱयांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणावा. ज्याच्याकडे शेतमाल खरेदी विक्रीचा परवाना असल्याबाबतची खात्री करावी. मार्केट यार्डाबाहेर मालाची विक्री करु नये. त्यामुळे फसवणूक थांबण्यास मदत होईल, असे सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.