प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र आता वर्दळीच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे देखील कानाडोळा करण्यात आला आहे. खानापूर रोडवर दत्त मंदिर समोरील रस्त्यावर भगदाड पडले आहे. अरूंद असलेल्या या रस्त्यावर हे भगदाड वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहे.
खानापूर रोडचे रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र काही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने दत्त मंदिर समोरील रस्त्याचे रूंदीकरण झाले नाही. त्यामुळे मंदिरासमोरील रस्ता अरूंद आहे. अशातच या ठिकाणी रस्त्याशेजारी भगदाड पडले आहे. वाहनधारकांना हे भगदाड लक्षात येत नाही. रात्रीच्यावेळी खूपच धोकादायक आहे. खानापूर रोडवर वाहनांची वर्दळ नेहमी असते. अवजड वाहनांसह लहान वाहने देखील या मार्गावरून ये-जा करीत असतात. विशेषतः रस्त्याच्या बाजुने दुचाकी वाहनधारक जात असतात. त्यामुळे त्यांना या खड्डय़ाचा धोका अधिक आहे. खड्डा बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यासह महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. पण महापालिकेने याबाबत कोणतीच उपाययोजना राबविली नाही. हा रस्ता अरूंद असून, या परिसरात फुटपाथ नसल्याने पादचारी रस्त्याच्या बाजुने चालत जात असतात. त्यामुळे पादचाऱयांना देखील धोकादायक बनले आहे. याची दखल घेऊन हे भगदाड बुजविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.