दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री
वृत्तसंस्था/ जयपूर
भजनलाल शर्मा यांनी शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अल्बर्ट हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल कलराज मिश्र यांनी तिघांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपशासित इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.
भाजप नेते भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी जयपूरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले भजनलाल शर्मा आता राजस्थानचे नवे प्रमुख असतील. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. राजस्थानच्या सांगानेर मतदारसंघातून ते आमदार आहेत.
यंदाच्या विधानसभेसाठी भाजपने राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय मिळाला. भाजपने 199 पैकी 115 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस पक्ष केवळ 69 जागांवर मर्यादित राहिला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भजनलाल शर्मा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल, असे ट्विट त्यांनी केले. भजनलाल शर्मा, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली.