रहिवाशांच्या आरोग्यास धोकाः स्वच्छता करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
विजयनगर-लक्ष्मीनगर परिसरातील भंगीबोळातील रस्त्यांकडे हिंडलगा ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी भंगीबोळात झाडे-झुडपे वाढून परिसरात साप व किडय़ांचे वास्तव वाढले आहे. रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने भंगीबोळांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ग्राम पंचायतकडून विविध विकासकामे आणि स्वच्छतेची कामे केली जात आहेत. रस्त्याशेजारी साचलेले कचऱयाचे ढिगारे हटविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. विजयनगर, डिफेन्स कॉलनी, आंबेवाडी क्रॉस अशा ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत होते. त्या ठिकाणी ग्राम पंचायतीने फलक लावून परिसराची स्वच्छता केली होती. त्यामुळे कचरा टाकण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र भंगीबोळातील स्वच्छतेच्यादृष्टीने कोणत्याच उपाय-योजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. विशेषतः विजयनगर आणि लक्ष्मीनगर परिसरातील भंगीबोळात गवत वाढल्याने रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. साप-किडय़ांसह डासांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भंगीबोळांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.