ऑनलाईन टीम
केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. याला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले आहेत. दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा दरम्यान शंभू सीमा बंद केली आहे.
शेतकरी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत रस्ते अडवून निषेध करणार आहेत. काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशवासियांना आवाहन केले आहे. टिकैत म्हणाले, या भारत बंद दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टरांसह सर्व आपत्कालीन सुविधा सुरू राहतील. आम्ही काहीही बंद केले नाही, आम्हाला फक्त एक संदेश पाठवायचा आहे. आम्ही दुकानदारांना आवाहन करतो की त्यांनी दुकाने आत्ता बंद ठेवा आणि संध्याकाळी ४ नंतरच उघडा. एकही शेतकरी बाहेरून येथे आलेला नाही,” असे राकेश टिकैत यांनी म्हटले.
बिहारमध्ये राजद नेते मुकेश रौशन आणि पक्षाचे इतर सदस्य आणि कामगारांनी शेतकरी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ हाजीपूरमध्ये निदर्शने केली. हाजीपूर-मुजफ्फरपूर रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तामिळनाडुत शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटकातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.