पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ ही काँग्रेस पक्षाची रॅली म्हणून आम्ही तिला सुकुंचित करू इच्छित नाही. ती तिरंगा झेंड्याखाली काढण्यात आली असून, सर्व समविचारी पक्ष, लोक त्यात सहभागी झाले आहे. देशात आतापर्यंत अनेक प्रकारच्या यात्रा झाल्या आहेत, परंतु ‘भारत जोडो यात्रा’ ही देशाला जोडणारी सर्वात मोठी यात्रा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी व्यक्त केले.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, अभय छाजेड, कैलास कदम, संगीता तिवारी उपस्थित होते.
अधिक वाचा : नोव्हेंबरमध्ये किमान तापमान जास्तच राहणार
चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान भारत जोडो यात्रा काढली आहे. महाराष्ट्र मध्ये ही यात्रा नांदेड जिल्ह्यात देगलुर येथे सुरवातीला येणार असून, काँग्रेस नेते त्यांचे स्वागत करतील. काँग्रेसमध्ये 60 संघटनात्मक जिल्हे राज्यात आहे. प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी यात्रेत समविष्ट व्हायचे आहे ते सांगण्यात आले आहे. पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बुलढाणामधील गावात पाठविण्यात येणार आहे. देशातील हा सर्वात मोठा कार्यक्रम असून, वेगवेगळय़ा प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर यांच्या यात्रा तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. अनेक सहयोगी राजकीय पक्षाच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आली असून, राज्यात केवळ पाच ते सहा जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात नेमके कोणत्या दिवशी येणार त्यानुसार येणे – जाणे, पार्किंग, राहणे, भोजन, सुरक्षा अशी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.