कृष्णात चौगले, कोल्हापूर
Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो, नफरत छोडो’ यात्रा सुरु करून 30 दिवसांहून अधिक कालावधी झाला. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी इलेक्ट्रॉनिक मिडियाकडून त्याला फारशी प्रसिद्धी दिली जात नसल्याचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप आहे. पण या यात्रेतील दृष्ये जिह्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी 13 एलईडी स्क्रीनचे रथ उपलब्ध केले. या रथाच्या माध्यमातून जिह्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेला यात्रेचे प्रक्षेपण पाहता आले. ही संकल्पना देशात प्रथमच कोल्हापुरात राबविली जात असून ‘भारत जोडो’ यात्रेत सबसे तेज ‘सतेज’ असेच चित्र पहावयास मिळाले.
एखादी निवडणूक असो अथवा सभा,मेळावा त्याचे परफेक्ट नियोजन करून ते यशस्वी कसे करायाचे यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा हातकंडा आहे. शनिवारी दसरा चौक मैदानात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये एलईडी रथाच्या माध्यमातून त्याची प्रचिती उपस्थित वरिष्ठ नेत्यांना आली.जे काही ‘नवीन’ तसेच ज्याचा कोणी विचार करू शकत नाही, विशेषतः तेच काम सतेज पाटील यांच्याकडून केले जात असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी काढले.आणि हीच संकल्पना सर्वत्र राबविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अचूक नियोजनाच्या माध्यमातूनच आमदार पाटील यांनी जिह्यात काँग्रेसला बळकटी आणली आहे.एखादी निवडणूक वर्ष,दोन वर्षानंतर होणार असली तरी त्याबाबतचे त्यांचे नियोजन अगोदर ठरलेले असते. जिह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच अन्य पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. आमदार पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे जिह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ होणार आहे.
2019 च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नूतन अध्यक्ष कोण होणार ? याची चर्चा सुरु असतानाच ‘प्रदेश’ने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा तत्कालिन आमदार सतेज पाटील यांच्याकडे सोपवली. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन आशा पल्लवीत झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सुरु असलेली काँग्रेसची ‘सतेज’ घौडदोड आजतागायत कायम राहिली आहे. आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पोषक स्थिती आहे. गटा-तटाचे राजकारण न करता काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जिह्यात काम सुरु केले. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामाला पक्षीय पातळीवर अधिकच ताकद मिळाली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे चार आमदार झाले. तर शिक्षक मतदार संघामध्येही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर विजयी मोहोर उमटवून आपण ‘किंगमेकर’ असल्याचे स्पष्ट केले. जिह्यात सर्वाधिक सहा आमदार झाल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. यासह गोकुळ दुध संघ आणि जिल्हा बँकेमध्ये काँग्रेसचे दबदबा आहे.
तालुकाध्यक्षांकडे सोपवल्या अनेक जबाबदाऱ्या
आमदार पाटील यांनी जिह्यातील सर्व तालुका कमिट्या रिचार्ज केल्या आहेत. त्यांना जबाबदारीची जाणीव करून देत त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या,सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व प्रश्नांची निर्गत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जे प्रश्न तालुका पातळीवर सुटत नाहीत,ते आपल्याकडे घेऊन येण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मरगळलेल्या तालुका कमिट्यांना उर्जितावस्था प्राप्त झाली असून त्याचा पक्षबांधणीसाठी मोठा फायदा झाला आहे.भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात एलईडी रथाद्वारे भारत जोडो यात्रेचे प्रक्षेपण दाखविण्याची जबाबदारी प्रत्येक तालुकाध्यक्षांवर सोपवली आहे.
आगामी निवडणुकांत काँग्रेसला ‘अच्छे दिन’
जिह्यातील प्रत्येक गावात काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे,त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही हात चिन्ह मिळवण्यासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.