सतेज पाटील यांची जबाबदारी वाढली; भाजप-शिंदे गटासोबतच निकराचा लढा
कोल्हापूर/संतोष पाटील
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचे प्रतिबिंद कोल्हापुरातही उमठले. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे यानिमित्ताने जिह्यात वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले. राज्यातील अडीच वर्षांच्या सत्ता काळात गोकुळ, जिल्हा परिषद अध्यक्षपद, जिल्हा बँक, शहर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत बाजी मारणं काँग्रेसला पर्यायाने सतेज पाटील यांना सोपं गेले. सत्ता नसताना त्यांच्या भोवतालचे कार्यकर्त्यांचे कडे कायम असली नसली तरी भारत जोडोच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिडात भरलेली हवा नजिकच्या काळात कायम ठेवावी लागेल. येत्या निवडणुकांत जिल्हा स्तरावर भाजप आणि शिंदे गटाच आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसची समझोता एक्सप्रेस ट्रकवर राहिल अशी आशा भारत जोडो यात्रेतील जिल्हानेत्यांचे एकत्रित प्रयत्नाने तूर्त ठेवण्यास हरकत नाही.
विश्वास संपादन करावा लागेल..!
भारत जोडो यात्रेनिमित्ताने राहुल गांधी यांनी निर्विवादपणे स्वतःचे नेतृत्व आणि समाजाच्या शेवटच्या घटकासोबत असलेली आपली नाळ सिद्ध केली. राहुल गांधी यांच्या यात्रेच फलित दृष्टीक्षेपात येण्यास अवधी लागू शकतो. तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना संयम ठेवून खालीपर्यंत उतरावे लागेल. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडे संस्थात्मक जाळे आहे, तसे पाहिल्यास राहुल गांधी यांच्याकडे लोकांना देण्यासाठी काही नाही. तरीही ते लोकांना विश्वास देत आहेत. लोकही त्यांचा स्वीकार करत आहेत. भारत जोडो यात्रेतून पावन होऊन आलेले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी यातून बोध घेऊन नव्याने उभारी घेतील ? सतेज पाटील आणि पी. एन.पाटील यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांचा गोतावळा सत्ता असो वा नसो कायम असतो. यापूर्वीची हजारोंची गर्दी ही विश्वासापोटीच होती. ती लाल दिवाच्या उजेडातील नव्हती हे कृतीतून यापुढे दाखवावे लागेल. सत्ता नाही म्हणून हाताची घडी घालण्यापेक्षा रस्त्यातील खड्डयापासून पंचगंगा प्रदूषण ते महागाई आणि सर्वसामान्यांना भेडसवणाऱया प्रश्नांवर रान उठवावे लागेल. तुमची सत्ता महापालिकेत आहे, राज्यात अडीच वर्षे सत्ता होती, तुम्ही काय केलं अशी टीका विरोधकांकडून होणारच? त्यावर विकासकामांचा लेखाजोखा आणि भविष्यातील शास्वत विकासाची हमी कोल्हापूकरांना दिली तरच भाजप आणि शिंदे गटाचे आव्हान काँग्रेस पेलू शकेल.
हवा तापती ठेवणार?
राज्यातील सत्तांतराने भाजपला पॉलिटिकल बुस्ट मिळाला आहे. शनिवारी (दि. 12) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी कोल्हापुरला भेट दिली. यातूनच भाजपसाठी कोल्हापूरचे राजकीय महत्व विषद होते. याउलट येऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची सेना या तीन पक्षातील डझनभर नेत्यांची तऱहा सांभाळार कोण हा प्रश्न आहे. उत्तर विधानसभा निवडणुकीसह आतापर्यंतचे यश ही सुज नसून ताकद होती, हे दाखवण्याचे मोठे आव्हान विखुरलेल्या महाविकास आघाडीपुढे असेल. त्यांना जिह्यातील एकसंघ भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय ताकदीचा सामना करावा लागणार आहे. हा सामना मागील पुण्याईवर जिंकता येणार नाही. त्यासाठी नव्याने मैदान मारण्याची रणनिती आखावी लागेल.
सतेज पाटील केंद्रस्थानी
भाजपने 2014 ते 2019 मध्ये राज्यातील सत्ताकेंद्र ताब्यात असताना केलेल्या जोडण्या सहकारी संस्थांसह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच निवडणुकांमध्ये फळाला आल्या होत्या. मधल्या अडीच वर्षात काहीशी बॅफूटवर गेलेली भाजप आता विधानसभा आणि सत्ताकेंद्र महत्वाची मानत आपल्या कार्यकक्षेत पक्षीय परिघाबाहेर जोडण्या करत आहेत. सर्वपक्षीयांच्या जोडण्या करण्यात भाजपला शिंदे गटाची निर्णायक साथ मिळत आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीमुळे राजकीय अस्तित्वाची चिंता डझनभर नेतेमंडळींना सतावत आहे. महाविकास आघाडीतील खदखद आणि सुप्त राजकीय इच्छा भविष्यात भाजपसह विरोधकांना उभारी देणारी ठरु नये, यासाठी महाविकास आघाडीतील कोल्हापुरातील कॅप्टन म्हणून सतेज पाटील यांची यापुढील काळातील राजकीय पावले महत्वाची ठरतील. शिंदे गटासोबत सध्या काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांत नाजूक संबंध आहेत. ही संभ्रमावस्था कायम ठेवणे, दोन्ही काँग्रेसलाच याचा फटका देणारी ठरू शकते. सतेज पाटील हेच भाजपच्या रडारवर असतील. या राजकीय लढय़ाची तयारी सतेज पाटील करत असले तरी संघटनापातळीवर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेस एकसंघ असल्याचा संदेश द्यावा लागेल. भारत जोडो यात्रेनिमित्ताने झालेली राजकीय हवा मतांचा टक्का वाढवण्यापर्यंत नेण्यासाठी सतेज पाटील यांना पी.एन. पाटील यांच्यासोबतीने ताकदीने उतरावे लागेल.
काँग्रेसकडून पाठबळाची गरज
प्रचार तंत्र, सहयोगी पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वासह जिह्यातील नेत्यांशी समन्वय, जलद हालचाली करुन विरोधकांना मात देण्यासाठी आक्रमक हालचाली, विरोधकांनी उचलेला प्रचाराचा मुद्दा नाकाम करण्यास पक्षीय अजेंडा पुढे रेटण्यास सतेज पाटील यांची रणनिती यशस्वी ठरल्याचे राजकीय जाणकार सांगतात. परफेक्ट नियोजन करुन करेक्ट कार्यक्रम करण्यात हातखंडा असलेल्या सतेज पाटील यांना काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी अजुन ताकद द्यावी लागेल. 2018 पासून सलग नऊ निवडणुकांत अपराजित राहत, अजात शत्रू ठरलेल्या सतेज पाटील यांना खरचं पॉलिटिकल बुस्ट मिळणार काय? हे पाहणे उत्सुकतेच ठरेल.