माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांचे मत
प्रतिनिधी /पणजी
गोमंतक मराठा समाजातील रत्नांनी आज उत्क्रांत झालेल्या एकूणच समाजाची निर्मिती केली आहे. या समाजातील एकेक रत्न हे वटवृक्षाप्रमाणे आहेत व त्यांच्या छायेखाली हजारो जणांचा उद्धार झाला आहे. गोव्याच्या उत्थापनाचे कार्य करणाऱया भाऊसाहेब बांदोडकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला हवे, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले. गोमंतक मराठा समाजातर्फे राजाराम स्मृती सभागृहात गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 49 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने खलप बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक, सचिव मंगेश कुंडईकर, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण आस्कावकर व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेचा भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिक्षण व समाजकार्य या क्षेत्रात मौलिक योगदान दिलेले उमेश अच्युत नाईक यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख पंचवीस हजार रुपये असे त्याचे स्वरूप होते. गजानन हरिश्चंद्र मांदेकर यांनी लेखन केलेल्या मानपत्राचे वाचन सुनील पिळगावकर यांनी केले. पुरस्काराच्या रकमेत एक लाख रुपये घालून सव्वा लाखाची देणगी यावेळी संस्थेच्या शैक्षणिक संकुलाला देत असल्याचे उमेश नाईक यांनी जाहीर केले.
भाऊंचे शिक्षण, विद्यार्थ्यांवर मुख्यमंत्री होण्याआधीपासून कसे होते हे याची आठवण ऍड खलप यांनी यावेळी सांगितली.
केदार नाईक यांनी सांगितले की, गोवा मुक्तीनंतर नवे सरकार प्रथम स्थापून प्रशासन, नियोजन अशी घडी बसविणे कठीण काम होते मात्र भाऊंनी हे काम उत्तम केले. भाऊंचे विचार घेऊन आजच्या एक चतुर्थांश आमदारांनी जरी कार्य केले तरी गोव्याला चांगले दिवस येतील. उमेश नाईक म्हणाले, गोव्यावर गोमंतकीयांनी राज्य कधी केले नव्हते भाऊ हे पहिले गोमंतकीय राज्यकर्ते ठरले. साधे सुखी जीवन जगायला मला अळणी वाटायला लागले म्हणून आम्ही समविचारी काहीजण एकत्र येऊन चिंबल येथे शिक्षणापासून वंचित मुलांसाठी विद्यालय सुरू केले. समाजासाठी मनापासून काम केले. विधवांना सहाय्य, निराधार महिलांना आधार, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे अशा योजना सरकारने अमलात आणण्यापूर्वी आम्ही आणल्या.
आमदार झाल्याबद्दल संस्थेतर्फे यावेळी केदार नाईक यांचा ऍड. खलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर यांनी स्वागत केले. संस्थेच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वाघुर्मेकर यांनी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर सुभाष जाण, श्रीकृष्ण आस्कावकर, सुनील पिळगांवकर, विनोद जांबावलीकर व सौ. उत्कर्षा बाणास्तरकर उपस्थित होत्या.
उत्कर्षा बाणास्तरकर व सोनाली लोलयेकर यांनी मान्यवरांना गुच्छ प्रदान केले. भाऊंचा प्रतिमेला पुष्पांजली वाहून सोहळय़ाला प्रारंभ झाला. ऍड. हर्षा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश कुंडईकर यांनी आभार मानले.