खंडणीसाठी सख्ख्या भावाचाच पाडला मुडदा : भीमाप्पाने जन्मदात्याला नाही सोडले, निर्दयीपणाचा कळस, गुन्हेगारांचा तीन जिल्ह्यात अक्षरश: नंगानाच
बेळगाव : पोलीस आणि कायद्याची भीती संपली तर अराजक माजते. काही गुन्हेगार या स्थितीचा गैरफायदा घेत अक्षरश: नंगानाच घालतात. सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण होते. पोलिसांबद्दलचा आदर संपायला लागतो. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी असेच माजलेल्या एका खतरनाक गुन्हेगारी टोळीचे कंबरडे मोडले आहे. बेळगाव शहर व उपनगरात गेल्या एक-दीड वर्षांपासून पोलीस व्यवस्थेची अक्षरश: वाट लागली आहे. अनेक खून प्रकरणांचा तपास रखडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ज्यांनी सेवेत असताना गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाकडे कधीच लक्ष दिले नाही. ते अधिकारी निवडणुकीसाठी बदली होऊन जातानाही अनेकांनी आपले खिसे कसे भरतील? या विचारातच येथून बाहेर पडले. जिल्ह्याचा कारभार मात्र नेमका या उलट आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या पुढाकारातून अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लागला आहे. रायबाग तालुक्यातील एका खतरनाक गुन्हेगारी टोळीतील सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस तपासात यासंबंधी उजेडात आलेली माहिती थक्क करणारी आहे. पोलीस यंत्रणा जर बरबटली तर बिहार स्टाईल गुन्हेगारी वाढण्यास वेळ लागत नाही. याचाच प्रत्यय रायबाग तालुक्यात आला होता. मात्र, जिल्हा पोलिसांनी खतरनाक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
18 ऑगस्ट 2022 रोजी 50 लाखांच्या खंडणीसाठी बाळाप्पा भूपाल अजुरे (वय 45) रा. खणदाळ, ता. रायबाग याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी जमीन विकून खंडणी देण्याची मागणी केली होती. कुटुंबीयांनी एक एकर जमिनीची विक्री करून निम्मी खंडणी दिली. आता आपल्या मुलाची सुटका करा, अशी विनंती केली. खंडणी घेतल्यानंतरही बाळाप्पाची सुटका झाली नाही. शिरगुप्पीजवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये त्याचा खून करून विशाळगड जवळील दरीत मृतदेह फेकून देण्यात आला होता. सहा महिन्यानंतर हारुगेरी पोलिसांनी बाळाप्पाची कवटी व सांगाडा जप्त केला. मुलाचे अपहरण व खून करून या गुन्हेगारांचे समाधान झाले नाही. 30 जानेवारी 2023 रोजी बाळाप्पाचे वडील भूपाल अजुरे (वय 70) यांचे अपहरण केले. त्यांच्या सुटकेसाठी पंधरा लाख रुपये खंडणी मागितली गेली. कुटुंबीयांनी ती दिली. त्यानंतर आणखी 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. खंडणी पोहोचली नाही म्हणून जेसीबी पळविण्यात आला. त्यामुळेच हे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एक एकर शेतजमीन विकून खंडणी देणाऱ्या वडिलांना मुलाचा खून झाला आहे, याची कल्पना नव्हती. पोलिसांनी वासुदेव सहदेव नायक, भुजंग तुकाराम जाधव, दोघेही राहणार खणदाळ, इरय्या सातय्या हिरेमठ, रा. केरुर, ता. चिकोडी, शिवानंद ऊर्फ शिवगोंड नानाप्पा सलखान, रा. नंदगाव, ता. अथणी, मल्लिकार्जुन गोसावी, रा. गोकाक व खून झालेल्या बाळाप्पाचा सख्खा भाऊ भीमाप्पा अजुरे रा. खणदाळ या सहा जणांना अटक केल्यानंतर अनेक अपहरण प्रकरणांचा उलगडा झाला.
एखाद्या घरभेद्याचा सहभाग असल्याशिवाय गुन्हेगारांना पुरेपूर माहिती मिळत नाही. बाळाप्पाचे अपहरण व खून प्रकरणातही त्याचा सख्खा भाऊ भीमाप्पा याने गुन्हेगारांना माहिती पुरविली आहे. खणदाळ येथील वासुदेव नायक हा अट्टल गुन्हेगार या टोळीचा मास्टरमाईंड आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट आदी तीन जिल्ह्यात 20 हून अधिक खून, खुनीहल्ला, दरोडे आदी प्रकरणे नोंद आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या खतरनाक गुन्हेगारांनी अक्षरश: तीन जिल्ह्यात नंगानाच केला होता. य् ाा टोळीच्या दहशतीमुळे कोणीच त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यास पुढे येत नव्हते. कोणाच्याही घरात शिरायचे, त्या घरातील एखाद्याचे अपहरण करायचे. भली मोठी खंडणी मागायची. तुमचा माणूस सुखरूप हवा असेल तर जमीन विकून खंडणी द्या, अशी मागणी करायचे. केवळ अपहरण व खूनच नव्हे तर वाहने अडवून दरोडे घालण्याचे कृत्यही या गुन्हेगारांनी केले आहे. जर कोणी खंडणी दिली नाही तर त्यांच्या घरासमोरील वाहने उचलून नेली जात होती. खणदाळचा वासुदेव नायक हा टोळीचा म्होरक्या असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही मोठी आहे.
गुन्हेगारांच्या भीतीमुळे अनेक जण मानसिक दबावाखाली
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमाकाठावरील गुन्हेगारांशीही त्यांचे संधान आहे. सध्या या टोळीतील सहा जणांना अटक झाली असली तरी एकूण 13 जणांची ही टोळी आहे. उर्वरित गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. आंबाघाट परिसरात आढळलेली हाडे बाळाप्पाचीच आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी डीएनए चाचणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या टोळीची दहशत मोडून काढण्यात पोलीस दलाला तूर्त यश आले असले तरी या गुन्हेगारांच्या भीतीमुळे आजही अनेक जण मानसिक दबावाखाली आहेत. अशा सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन धीर देण्याचे काम पोलीस दलाला करावे लागणार आहे.