युवराज भित्तम, म्हासुर्ली
राई (ता.राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामानिमित श्रीनिवास कन्स्ट्रक्शन ठेकेदार कंपनी शक्तीशाली भुसुरुंगाचा वापर करत आहे.परिणामी चौके-मानबेट परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत.तर पाण्याच्या बोरवेल व जीवन झऱ्याचे पाणी आटले आहे.तसेच ध्वनी व वायू प्रदूषण बाबत ग्रामस्थ,ग्रामपंचायत यांनी तोंडी, लेखी तक्रार करूनही ठेकेदार कंपनी व शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणी नदीवर सध्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम जोरदार सुरु असून चौके -मांडकरवाडी गावांच्या बाजूने जाणाऱ्या सांडवा कालव्याचे काम जोरदार सुरू आहे.येथील दगड फोडण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून शक्तिशाली भुसुरूंगाचा वापर अमर्यादीत प्रमाणात अखंड सुरु आहे.भुसुरुगांच्या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड असते की गावातील घरांना प्रचंड हादरे बसतात.परिणामी मानबेट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मानबेट,चौके,राई,कंदलगाव,मांडवकरवाडी गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या डोंगरातील जीवंत झऱ्यावरील सायफन नळ पाणी योजनाचे झरे आटत चालले आहेत.झर्यांतुन येणारे पिण्याचे पाण्याचे स्रोत हे भूसुरुंगाच्या तीव्रतेने बंद झाले आहेत.तसेच खासगी बोअरवेल,विहीरीचे पाणी सुध्दा बंद झाले आहे.त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
कंपनीने उपायोजना कराव्यात
अतितिव्रतेच्या भुसुरुंगाने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असुन आगामी उन्हाळ्यात भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे.भुसुरुंगाची तीव्रता कमी करण्याबाबत अनेक वेळा सुचना केल्या आहेत.मांडवकरवाडी व चौके येथील घरांना तडे गेल्याने धोका निर्माण झाला आहे.याची गंभीर दखल संबंधीत कंपनीने घेऊन उपाय योजना कराव्या
संभाजी कांबळे, सरपंच ,ग्रामपंचायत मानबेट
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
ब्लास्टिंगमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रचंड धुळीमुळे शेतशिवारे मातीमोल झाली आहेत,तर शालेय विद्यार्थी देखील जीव मुठीत धरून शाळेत जात आहेत.गावातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य धुरळ्यामुळं धोक्यात आलं आहे. प्रशासनाने यावर उपाय काढावा.
शिवाजी गोरुले,माजी सरपंच