वृत्तसंस्था/ हैदराबाद
बीआरएस नेते आणि खम्ममचे माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे भाजपच्या वाटेवर आहेत. रेड्डी हे 18 जानेवारी रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. रेड्डी आणि शाह यांची भेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अडचणी वाढविणारी ठरणार आहे. श्रीनिवास रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चालू वर्षात राज्यात होणारी विधानसभा निवडणूक पाहता बीआरएसला हा मोठा धक्का ठरणार आहे.
16 आणि 17 जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यावर रेड्डी हे पक्षाच्या नेतृत्वाला भेटणार आहेत. श्रीनिवास रेड्डी हे भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे, परंतु रेड्डी यांच्याकडून अद्याप कुठलेच अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
राज्य सरकारकडून सुरक्षेत कपात
भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांची पदयात्रा खम्मममध्ये पोहोचली होती. या पदयात्रेदरम्यान श्रीनिवास रेड्डी यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु त्यांचा त्यावेळी पक्षप्रवेश होऊ शकला नव्हता. तरीही भाजपने स्वतःचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी श्रीनिवास रेड्डी यांनी समर्थकांच्या एका बैठकीत बीआरएसमध्ये पद मिळाले नसले तरीही लोकांकडून मोठे समर्थन प्राप्त असल्याचे म्हटले होते. रेड्डी यांच्या या टिप्पणीनंतर राज्य सरकारकडून त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती.
वायएसआर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष
श्रीनिवास रेड्डी हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात निवडून आलेले वायएसआर काँग्रेसचे एकमात्र खासदार होते. तसेच त्यांनी वायएसआर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या कुटुंबाशी असलेल्या जवळीकीमुळे ते वायएसआरटीपी प्रमुख वाय.एस. शर्मिला यांच्यासोबत जातील असा अनुमान होता, परंतु 2018 ची विधानसभा निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत टीआरएस (आता बीआरएस) उमेदवारांना समर्थन दिले होते.
प्रभारी सुनील बंसल यांची नजर
रेड्डी यांच्या पक्षप्रवेशासंबंधी भाजपनेही मौन साधले आहे. परंतु आता पक्षाचे प्रदेश प्रभारी सुनील बंसल हे रेड्डी यांच्या पक्षप्रवेशाविषयी पावले उचलत असल्याचे सांगण्यात आले. 14 जानेवारीनंतर तेलंगणातील अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार आहेत. श्रीनिवास रेड्डी आमच्या पक्षात आले तर ही आमच्यासाठी मोठी कामगिरी ठरणार असल्याचे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.