सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘गुजराती ठग’ वक्तव्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तेजस्वी यांच्याविरोधातील याचिका फेटाळली आहे. तेजस्वी यादव यांच्या विरोधात आता अहमदाबादमध्ये सुनावणी चालणार नसल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांचा माफीनामा मंजूर केला आहे.
‘केवळ गुजरातीच ठग असू शकतात’ असे वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले होते. या वक्तव्याच्या विरोधात अहमदाबाद येथील न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला होता. तर तेजस्वी यादव यांनी याप्रकरणाची सुनावणी दिल्लीत वर्ग करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
न्यायाधीश ए.एस. ओक आणि उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने मंगळवारी तेजस्वी यांच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. यापूर्वी खंडपीठाने 29 जानेवारी रोजी तेजस्वी यादव यांना स्वत:ची टिप्पणी ‘केवळ गुजरातीच ठग असू शकतात’ मागे घेत योग्य वक्तव्य सादर करण्याचा निर्देश दिला होता.
तेजस्वी यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत स्वत:ची टिप्पणी मागे घेतली होती. तत्पूर्वी गुजरातमधील न्यायालयाने तेजस्वी यांच्या विरोधात प्रारंभिक चौकशी करविली होती.