उत्तरप्रदेशातील सर्व पक्षसमित्या भंग
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रदेशाध्यक्ष वगळता पक्षाच्या सर्व युवा संघटना, महिला विभाग तसेच अन्य शाखांचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष समवेत राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणी भंग केली आहे.
मार्च महिन्यात झालेली विधानसभा निवडणूक आणि अलिकडेच झालेल्या रामपूर तसेच आझमगड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अखिलेश यांनी फेरबदलाची तयारी केली आहे. अखिलेश यांनी उत्तरप्रदेश अध्यक्ष नरेश उत्तम पटेल वगळता उर्वरित सर्व पदाधिकाऱयांना हटविले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नव्याने संघटना तयार केली जाणार असल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षाने पहिल्यांदाच मोठी कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला 111 जागांवर यश मिळाले होते. पक्षाला मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्याचे म्हणत अखिलेश यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आझमगड आणि रामपूर येथे पक्षाचा पराभव झाल्यावर अखिलेश यांनी नव्या पदाधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून अखिलेश यांच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. पक्षाच्या समित्या विसर्जित करून आता राज्य स्तरावर पुन्हा एकदा मजबुतीने उभे राहण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा स्थितीत संघटनात्मक निवडणुकीचीही तयारी होऊ शकते. यामुळे पक्षाला तळागाळात संघटित होण्यास मदत मिळू शकते. अखिलेश यादव आता संघटनेत पूर्णपणे बदल घडवून आणणार असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत पक्ष संघटनेत मुलायम सिंह यादव यांचा प्रभाव दिसून येत होतो. परंतु आता अखिलेश स्वतःची नवी फळी निर्माण करू पाहत आहेत.