ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात बंडखोरीचं नाट्य गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असताना बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे पाच पैकी चार आमदार आरजेडीमध्ये (RJD) गेले आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल ईमान वगळता इतर चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. सर्व आमदार बुधवारी आरजेडी नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असताना दुसरीकडे बिहारमध्येही राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. एमआयएमच्या ४ आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केल्याने ओवैसीच्या पक्षाला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे ५ आमदार जिंकले होते. यातील चार आमदारांनी आता एमआएममधून बाहेर पडत आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शाहनवाज, मोहम्मद अनजर नीमी, मोहम्मद इजहार असफी, सय्यद रुकनुद्दीन आमदारांची नावे आहेत.
ओवैसी यांच्या पक्षला खिंडार पडल्यानं भाजपला धक्का बसला आहे. आरजेडी बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. बिहारमध्ये सध्या विधानसभेत आरजेडीचे ८०, भाजपचे ७७, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, डाव्यांचे १६, आणि इतर सहा आमदार आहेत.