बिहारमध्ये जे घडले ते इतके नाटय़मय की कोणालाही विस्मय पडावा. स्वतःला जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष समजणाऱया संघटनेला दूधातून माशी काढून बाहेर फेकून द्यावे तद्वतच सरकारमधून बाहेर काढण्याचे अभूतपूर्व काम ज्या शिताफीने नितीश कुमार यांनी केले त्याने भले भले अचंबित झाले नसते तरच नवल होते. केंद्र सरकार आणि त्यातील एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआय, इनकम टॅक्स डिपार्टमेंट दिमतीला असूनदेखील कुमार अथवा त्यांच्या संयुक्त जनता दलाचे कोणी काहीच वाकडे करू शकले नाही. एव्हढेच नव्हे तर ‘आम्ही कोणालाच घाबरत नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा’ असे एकप्रकारचे आव्हानच नितीश यांच्या पक्षाने देऊन सत्ताधाऱयांना दमात उखडले आहे.
बिहारमध्ये कोण सत्तेत आले आणि का आले हा भाग तात्पुरता बाजूला ठेवला तर काय दिसते तर केंद्रात अजेय समजल्या गेलेल्या भाजपच्या समोर अचानक आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वीस महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा फड मारणार अशी समजूत आणि ठाम विश्वास विरोधी पक्षातील देखील काही नेते बोलून दाखवत होते. अशावेळी पाटण्याच्या नाटय़मय घटनांमुळे पुढील निवडणुकीत देशभर भाजपशी दोन हात विरोधी पक्ष करू शकतात असा विश्वास मोदी विरोधकांमध्ये अचानक आला आहे. विरोधकांची भीती मोडली आहे. जेव्हा भीती मोडते तेव्हा नव्या उभारीने काम होते. दमलेल्या विरोधकांना केवळ दमदार दिलासाच मिळाला आहे असे नाही तर जणू पॉवरफुल बूस्टर डोसच लाभला आहे.
या बूस्टर डोसचे ते सोने करतात की माती ते येत्या काळात दिसून येणार आहे. भाजपचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा साथीदार एका रात्रीत विरोधकांचा स्टार नेता बनला आहे. हे चित्र अजब असले तरी वास्तव आहे. नितीश विरोधकांना तो अजून वारंवार राजकीय कोलांटय़ाउडय़ा मारणारा ‘पलटू राम’ वाटत असला तरी त्यात गैर काही नाही. गम्मत अशी की नितीशच्या या ताजा पलटीने भाजपचे सारे राजकारण उफराटे झालेले दिसत आहे. एकेकाळी ‘सुशासनबाबू’ म्हणून प्रख्यात झालेले नितीश हे फार थोर असे लोकोत्तर नेते मुळीच नव्हेत. पण त्यांचे महत्व एकदम वाढण्याचे कारण म्हणजे त्यांनी मोदी-शहा यांचेच राजकारण त्यांच्यावर उलटवले आहे की सत्ताधाऱयांना पाणी पण मागता आलेले नाही.
गैरभाजप पक्षांची सरकारे चुटकीसरशी पाडण्याची सवय भाजपला झाली असल्याने अशी वेळ आपल्यावर कधीतरी येऊ शकते अशी स्वप्नातही कल्पना सत्ताधारी मंडळींनी केली नव्हती. विरोधी पक्ष पाप्याची पितर झाली असल्याने आपल्याशी पंगा घेणारा या भूतलावर उरलेलाच नाही या भ्रमात होती. महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडण्याचे काम भाजपने केले या बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या वक्तव्यावर वाद माजणे साहजिकच आहे. महाराष्ट्रात एक सांगितले जात आहे त्याच्या सुशील मोदी विपरीत सांगत आहेत. तामिळनाडूच्या एका वरि÷ भाजप नेत्याने आता राज्याराज्यांत ‘एकनाथ शिंदे’ निर्माण होतील असे गेल्या महिन्यात सांगितले होते तसेच एकप्रकारे सुशील मोदी म्हणत आहेत. अशावेळी आरसीपी सिंग या नितीश यांचा एकेकाळी उजवा हात असलेल्या नेत्याला केंद्रीय मंत्री केल्यापासून भाजपने हळूच आपल्या कळपात ओढले होते. आपल्या सरकारमधून भाजपला नारळ देण्याचा कार्यक्रम नितीशनी वर्षभरापूर्वीच ठरवला. आपले कात्रज करणारा अजून जन्मायचा आहे अशा भापात सत्ताधारी राहिले. त्यांचा घात होणे ठरलेलेच होते.
मजेची गोष्ट अशी की 71 वर्षाच्या नितीशना ‘तुमचे राजकारण आता संपायला आलेले आहे. जाताना दुकान आमच्या हवाली करून जावा’ असे गेल्या दोनतीन वर्षात भाजपकडून वारंवार सांगितले जात होते. अर्धी टर्म झाल्यावर नितीशनी मुख्यमंत्रीपद भाजपला दिले पाहिजे अशी जणू मोहीमच भाजपचे खासदार छेदी पासवान यांनी सुरु केली होती. भाजपकडून मात्र 2025 पर्यंत मुख्यमंत्री नितीश राहणार असे सांगितले जात होते पण पासवान यांना आवर घालण्यात आलेला नव्हता. कोणीही नेता आपसूक सत्ता दुसऱयाला देत नाही. आपल्याला नारळ देण्याचा कार्यक्रम भाजपने सुरु केला हे चाणाक्ष नितीशनी ताडले आणि भाजपलाच नारळ दिला.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण
‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो’ या न्यायाने बघितले तर भाजपला पुढील काळात चिंता करण्याची तसेच चिंतन करण्याची गरज आहे, ‘मोदी है तो मुमकिन है’, या घोषणेवर शंभर टक्के विश्वास ठेवून जसे आहे तसे चालू दिले तर आव्हाने उभी ठाकू शकतात. मोदी आणि नितीश हे दोघेही जुन्या पठडीतील राजकारणी आहेत. बिहारमध्ये दारूबंदी लागू करून महिलावर्गात नितीशनी स्वतःचे एक आगळे स्थान निर्माण केले आहे.
बिहारमध्ये भाजप सोडून सारे पक्ष नितीश, लालु आणि काँग्रेसबरोबर आले आहेत. आता नजीकच्या भविष्यकाळात हे चित्र साऱया देशात बघायला मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ ‘भाजपमुक्त भारत’ करण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संकल्प सोडला जाणार आहे. एका राष्ट्रीय नियतकालिकाने नुकत्याच केलेल्या एका पाहणीमध्ये जो निष्कर्ष काढला आहे तो भाजपला विचार करायला लावणारा आहे. नितीश यांनी भाजप प्रणित रालोआला राम राम ठोकल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या 21 जागा कमी होणार आहेत मोदी हे निःसंशय सर्वात लोकप्रिय नेते अजून आहेत आणि या पाहणीमध्ये भाग घेतलेल्यात निम्म्यापेक्षा जास्त जणांनी पुढील पंतप्रधान म्हणून त्यांनाच निवडले आहे. पण त्यातील नऊ टक्के लोक राहुल गांधी तर जवळजवळ सहा टक्के लोकांना अरविंद केजरीवाल हे भावी पंतप्रधान वाटतात. आजच्या घडीला निवडणूका घेतल्या तर रालोआला लोकसभेतील एकूण 543 जागांपैकी केवळ 286 जागा मिळतील. याचा अर्थ तो जेमतेम पास होईल. कारण बहुमत मिळण्यासाठी किमान 272 जागा मिळाव्या लागतात. विरोधी पक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या जागा 146 पर्यंत वाढतील. नितीश कुमार हे भाजपपासून फूटून निघण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात रालोआला 301 जागा तर विरोधी आघाडीला 111 जागा होत्या. नितीशनी दिलेल्या जमालगोटय़ाने सत्ताधारी आघाडी लंगडी होत चालली आहे असाच याचा अर्थ होय.
सुनील गाताडे