हारुगेरी पोलिसांची कारवाई : शस्त्रs, रोकड जप्त : खंडणीसाठी तरुणाचा खून केल्याचे उघड : 20 गुन्ह्यात सहभाग
बेळगाव : अपहरण करून लाखो रुपये खंडणी उकळणाऱ्या खतरनाक टोळीतील चौघा जणांना हारुगेरी पोलिसांनी अटक केली असून या टोळीतील आणखी सुमारे सहाहून अधिक जण फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बेळगाव जिल्ह्यात या टोळीने अपहरण, दरोडे असे अनेक गुन्हे केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या एका खतरनाक गुन्हेगाराचाही यामध्ये समावेश आहे. तब्बल 20 गुन्ह्यांत त्याचा सहभाग आढळून आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सोमवारी हारुगेरी येथे पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, अथणीचे पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी. व इतर अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली वाहने, शस्त्रs व रोकड जप्त केली आहे. ही टोळी बिहार स्टाईलने धनिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी उकळत होती. खंडणी न देणाऱ्यांचा काटाही काढला जात होता.
वासुदेव सहदेव नायक, भुजंग तुकाराम जाधव (दोघेही रा. खनदाळ, ता. रायबाग), ईरय्या सातय्या हिरेमठ (रा. केरुर, ता. चिकोडी), शिवानंद ऊर्फ शिवगोंड नानाप्पा सलखान (रा. नंदगाव, ता. अथणी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा जणांची नावे आहेत. त्यांचे साथीदार फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहेत. सुमारे 10 ते 12 जणांची ही टोळी असून खास करून रायबाग तालुक्यातील धनिकांना हेरुन त्यांचे अपहरण करायचे. खंडणी घेऊन त्यांची सुटका करायची. खंडणीची रक्कम दिली नाही तर अपहृताचा खून करायचे, असे कृत्य केले आहे. या टोळीने एका अपहृत तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले असून त्याचा मृतदेह कोल्हापूरजवळ टाकून दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस त्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. 11 फेब्रुवारी 2023 रोजी शांतव्वा उर्फ शांतक्का भूपाल आजुरे यांनी हारुगेरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 30 जानेवारी 2023 रोजी आरोपींनी जांबियाचा धाक दाखवून शांतव्वाचे पती भूपालचे अपहरण केले होते. 15 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. 15 लाख रुपये मिळाल्यानंतर आणखी 30 लाख रुपये द्या नाही तर त्याचा मृतदेह पहावा लागेल, असे धमकावले होते.
रविवार दि. 19 फेब्dरुवारी रोजी चौघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जबानीतून एका अपहृताचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी खनदाळ येथील एका तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह कोल्हापूर जवळील घाटात टाकून देण्यात आला आहे. हा तरुण भूपाल आजुरेचा मूलगा असल्याची माहिती मिळाली आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी खनदाळ येथे जांबियाचा दाख दाखवून एका व्यक्तीला लुटण्यात आले होते. 30 हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल संच, एक जेसीबी, एक मोटार सायकल पळविण्यात आली होती. बागेवाडी साखर कारखान्याजवळ जेसीबी सोडून हे गुन्हेगार पळाले होते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी आणखी एका व्यक्तीचे अपहरण करुन 5 लाखांची खंडणी घेण्यात आली होती. सुटका केल्यानंतर पुन्हा त्याच्याकडून 17 लाख 50 हजार रुपये वसुल करण्यात आले होते. हारुगेरी पोलीस स्थानकात या सर्व प्रकरणांची नोंद झाली होती. पोलिसांनी त्यांच्याजवळून केए 48 एम 3949 क्रमांकाची सुमारे दोन लाख रुपये किंमतीची मारुती सुजुकी कार, एमएच 12 बीजी 4458 क्रमांकाची सुमारे 80 हजार रुपये किंमतीची मारुती सुजुकी अल्टोकार, एक बटण चाकु, जांबिया, तलवार, 4 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम, अपहृताच्या डोळ्याला घालण्यात येणारा चष्मा, 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
तब्बल 20 गुन्ह्यात फरारी
पोलिसांनी अटक केलेल्या चौघा जणांमध्ये वासुदेव सहदेव नायक (वय 35, रा. खनदाळ) या खतरनाक गुन्हेगाराचा समावेश आहे. त्याच्यावर बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यात 20 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. रायबाग पोलीस स्थानकात 1, जमखंडी ग्रामीण पोलीस स्थानकात 1, आलमेल पोलीस स्थानकात 1, चिकोडी पोलीस स्थानकात 1, बेळगाव मार्केट पोलीस स्थानकात 1, घटप्रभा पोलीस स्थानकात 1, गोकाक शहर पोलीस स्थानकात 4, मुरगोड पोलीस स्थानकात 4, कटकोळ पोलीस स्थानकात 1, हारुगेरी पोलीस स्थानकात 4 अशी एकूण 20 हून अधिक गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. सध्या तो फरारी होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.