नितीश कुमारांचा निर्णय ः कार्तिक कुमारांकडे आता ऊस उद्योग मंत्रालय
वृत्तसंस्था / पाटणा
शपथविधीच्या दुसऱयाच दिवशी अपहरणप्रकरणी वॉरंट बजावण्यात आल्याने अडचणीत आलेले बिहारचे कायदामंत्री कार्तिक कुमार यांचे खाते बदलण्यात आले आहे. कार्तिक कुमार यांना आता ऊस उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शमीम अहमद आता बिहारचे नवे कायदामंत्री असतील. कार्तिक कुमार यांना अपहरणाच्या गुन्हय़ाप्रकरणी ज्या दिवशी न्यायालयात शरणागती पत्करायची होती, त्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच कार्तिक कुमार हे न्यायालयानुसार 8 वर्षांपासून फरार होते. अनंत सिंह यांचे निकटवर्तीय अन् राजदच्या कोटय़ातून मंत्री झालेले कार्तिक यांनी वादावर स्पष्टीकरण दिले होते. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्तिक यांच्यावरील आरोपांची माहितीच नव्हती, असा दावा केला होता.