वळणावर गतिरोधकाअभावी वारंवार घडताहेत अपघात
वार्ताहर /हिंडलगा
भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात कागणी (ता. चंदगड) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 16 रोजी दुपारी मण्णूर येथे घडली. गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गतिरोधक नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कागणीहून मण्णूरमार्गे बेळगावला जात असलेल्या दुचाकीस्वाराला (एमएच 09 एफके 0811) गावापासून जवळच असलेल्या वळणाजवळ बेळगावहून भरधाव वेगाने येणाऱया कारची टक्कर बसली. त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्याकडेला उडून पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतर सदर कारमालकानेच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तर सायंकाळी उशिरापर्यंत अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याकडेलाच पडून होती.
हिंडलगा पंपिंग स्टेशन ते उचगावपर्यंतच्या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुचाकीबरोबरच चारचाकी व अवजड वाहने देखील सुसाट वेगाने जात आहेत पण रस्त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करून देखील धोकादायक वळणे असलेल्या ठिकाणी गतिरोधक घालण्याकडे संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फटका मात्र निष्पाप वाहनधारकांना बसत असून अनेकांना अपघातांचा सामना करावा लागला आहे. याशिवाय काही ठिकाणी रस्ता देखील खचला असून वाहनांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच धोकादायक वळणावर गतिरोधक घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.