अनेक दशकांपासून मूर्तीला लावलेला शेंदूर काढण्याचे काम सुरु, रंगाआड गेलेले प्राचीन कालीन मंदिराचे मुळस्वरुपही येणार उजेडात
कोल्हापूर/संग्राम काटकर
कोल्हापूरच्या मध्यवस्तीतील महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला लावलेला शेंदूर काढून मुळस्वरुपात आणण्याचे काम सुरु आहेत. गणेशोत्सव, गणेशजयंती, अंगारकी संकष्टीवेळी मूर्तीला शेंदूर लावला जात होता. गेल्या 6 ते 7 दशकांपासून गणपतीच्या मूर्तीवर अजानतेपणे लावलेल्या या शेंदुराचा जाडजुड थर बनला होता. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या रुपासह आभुषणे झाकोळले गेले होतेच, शिवाय तिच्या सौंदर्यालाही लपून गेले होते. याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने गांभिर्याने पाहून मूर्तीला शेंदूरमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या 10 दिवसांपासून सावधगिरीने मूर्तीवरील शेंदूर काढला जात आहे. येत्या काहीच दिवसात मूर्ती शेंदूरमुक्त करुन ती मुळस्वरुपात भाविकांसाठी खुली केली जाणार आहे.
करवीर छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्या आदेशानुसार प्राचिन कालीन स्थापत्थशास्त्रानुसार चिरेबंदी दगडात बिनखांबी गणेश मंदिराची स्थापना व बांधकाम केले. अतिशय सावधगिरीने बांधलेल्या या पूर्वाभिमुख मंदिराची माहिती जशी उजेडात येऊन लागली तशी त्याच्यातील वास्तुशिल्पकलेचा अद्वितीय नमुना लोकांना समजू लागला. मंदिराच्या मध्यभागी कोठे ही खांब नसल्याने या मंदिराला बिनखांबी म्हणून संबोधले जाऊ लागले. शिवाय या मंदिराच्या भिंतीवर कीस्टोन’ किंवा आर्चकोन पद्धतीने मंदिराचा समतोलपणा राखला गेला आहे. इतकेच नव्हे तर मंदिराचा समतोल हा भक्कम पायावर उभारून त्याच्यावर उंच शिखर बांधले. ते आतून पोकळी व गोलघुमट पद्धतीचे आहे. या मंदिर बांधणीचे खरे कसब सभामंडपाच्या छताच्या बांधकामात दडलेले आहे. छताच्या मध्यभागी जो कीस्टोन किंवा आर्चकोन आहे, त्याचाच आधार घेऊन छत व उंच शिखर तयार केले आहे. अशा या अद्वितीय मंदिरातील चबुतऱ्यावर आकर्षक अशी दगडी प्रभावळ असलेली पुरातनकालीन गणपतीची मूर्ती विराजमान केली.
दरम्यानच्या काळात कोल्हापूरच्या गादीची स्थापना केल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी यांनी साताऱयाचे सर जोशीराव यांना धर्मकृत्याचे मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरला आणले. जोशीरांवाच्या घराण्याचे उपास्य दैवत हे गणपती असल्यामुळे कोल्हापूरात गणपतीची अनेक देवालये ही सर जोशीराव यांचीच असल्याचे सांगितले जाते. बिनखांबी गणेश मंदिर हे देखील त्यापैकीच एक. या मंदिराच्या मागे व पश्चिमेला जोशीराव वाडा होता. शिवाय मंदिरातील गणपतीची पूजाअर्चा ही जोशीराव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. याच काळात मंदिराचे बांधकाम पूर्ण ही झाले होते. पण मंदिरातील पूर्वीची गणपतीची मूर्ती गाभाऱयाच्या उंची व रुंदीच्या तुलनेने छोटी वाटू लागली. त्यामुळे दुसऱया मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्याचा विचार पुढे आला. सुदैवाने जोशीरावच्या वाडयाच्या कठडयावरील आकाराने मोठय़ा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करावी, अशी विनंती भाविकांनी जोशीराव यांनाच केली. त्यांनीही लोकभावना विचारात घेऊन मूर्ती मंदिरासाठी देऊ केली. ही मूर्ती त्याकाळी जोशीराव वाडय़ातील (घरनंबर. 2728 ए वॉर्ड) विहीरीत तात्याराव जोशीराव यांना दिसली होती. त्यांनी ही मूर्ती विहीरी बाहेर काढून कठडय़ावर आणून ठेवली होती. लोकमागणीतून या मूर्तीची बिनखांबी गणेश मंदिरात प्रतिष्ठापना केल्याने मंदिराला ’जोशीराव गणपती’ असेही नांव पडले होते.
गेल्या बऱयाच वर्षापासून या मूर्तीला गणेशोत्सव, गणेशजयंती, अंगारकी संकष्टीवेळी शेंदूर लावण्यात येत होता. त्यामुळे मूर्तीवर शेंदुराचा थर वाढतच गेल्याने तिचे सौंदर्यच झोकोळले गेले होते. अजातनपणे झालेल्या या प्रकारातून गणेशमूर्तीला मुक्त करण्यासाठी देवस्थान समितीने पुढाकार घेतला. शेंदूर मूर्तीवर नेमका किती आहे याची पाहणी केली असता जाडजूड थर असल्याचे आढळले. भविष्यात शेंदुराच्या थराचा विपरीत परिणाम होईल म्हणून मूर्तीवरील शेंदूर काढण्यात येत आहे. आता लवकरच मूर्ती शेंदूरमुक्त होणार आहे.
दगडी बांधकाम उजेडात येणार…चांदीची आभुषणेही करणार…
कोल्हापुरातील हजारो लोक आजही बिनखांबी मंदिरातील गणपतीचे दर्शन घेऊन आपली दिनचर्या सुरु करतात. संकष्टीच्या दिवशी तर दर्शनासाठी भाविकांची रिघ असते. अशा या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराला दिलेला रंग काढून मुळ दगडी स्वरुप उजेडात आणले जाणार आहे. गणपतीची मूर्ती शेंदूरमुक्त झाली की भिंतीचा रंग काढण्याचे काम हाती घेतले जाईल. याचबरोबरच गणपतीच्या मूर्तीसाठी जी जी चांदीचा आभुषणे आवश्यक आहेत ती ती सर्व तयार करुन घेतली जातील.
शिवराज नाईकवाडे (सचिव : देवस्थान समिती)