जनतेला तास्नतास राहावे लागते ताटकळत, बायोमेट्रिकची सक्ती झाली डोईजड
आप्पाजी पाटील/ खानापूर
सप्टेंबरपासून राज्यभरात शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानावर बायोमेट्रिक दोनदा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे रेशन घेण्यासाठी केलेली ही सक्ती रेशनकार्डधारकांसाठी शिक्षा ठरली आहे.
गेल्या कोरोनाच्या काळापासून प्रत्येक व्यक्तीनिहाय दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना रेशन देण्यात येत आहे. केंद्र सरकारची ‘पंतप्रधान गरीब कल्याण भाग्य योजना’ तर राज्य सरकारची ‘अन्नभाग्य योजना’ या दोन योजनांद्वारे एक राज्य सरकार तर दुसरे केंद्र सरकार यांच्यामार्फत प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य याप्रमाणे रेशन वितरण करण्यात येत आहे. यापूर्वी एकच अंगठय़ाच्या ठशावर दोन्ही योजनांसाठी बायोमेट्रिक घेतली जात होती. त्यावेळी बायोमेट्रिक देण्यासाठी लोकांना रांगेत किमान तासभर तरी उभे राहावे लागत होते. आता तेच रेशन मिळवण्यासाठी दोनदा अंगठा लावण्याची सक्ती करण्यात आल्याने त्यासाठी दुप्पट वेळ जात आहे.
खानापूर तालुक्मयातील निम्म्याहून अधिक गावे डोंगराळ प्रदेशात आहेत. बहुतेक गावात मोबाईल रेंजची समस्या आहे. त्यामुळे एका व्यक्तीचा दोनदा अंगठा लावून घेण्यासाठी रेशन दुकानदारांची मोठी गोची होत असून डोकेदुखीत वाढली आहे. त्यातच या भागात दमदार पाऊस होत असल्याने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होतो. त्यामुळे विजेअभावी संगणकीय यंत्रणाच बंद पडते. यावेळी रांगेत राहून विद्युतपुरवठा केव्हा कार्यान्वित होणार? याची वाट पाहत बसावी लागते. काही दुकानातून रेंज येत नसल्याने गावच्या टोकावर असलेल्या एखाद्या उंचावरील मंदिरात बसून अंगठा लावून घेण्याची परिस्थिती दुकानदारावर येते.
खानापूर तालुक्मयातील 80 टक्क्मयांहून अधिक लोक शेती व्यवसायात कार्यरत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतातील कामे करून घ्यावी लागतात. दरम्यानच्या काळातच रेशन दुकाने सुरू राहतात. रास्त दुकानात उपस्थिती दर्शवून रेशनसाठी आपला संपूर्ण दिवस काढून अंगठा लावण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे रेशनसाठी नियोजित संपूर्ण दिवसाचे काम शिल्लक राहते. त्यासाठी दोन वेळा अंगठा लावणे ही सक्ती जनतेला एक प्रकारे शिक्षा ठरली आहे.
खानापूर तालुक्मयात 6 हजार 729 अंत्योदय तर 57 हजार 442 बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला रेशन घेण्यासाठी आता दोनदा अंगठे लावावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेशनवर मिळणारे रॉकेल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळय़ात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात दिवस काढण्याची परिस्थिती खानापूर तालुक्मयातील जनतेवर आली आहे.
पाच महिन्यापासून मानधनच नाही- महादेव दळवी
गेल्या पाच महिन्यांपासून रेशन दुकानदारांना मानधनच देण्यात आले नाही. त्यातच आता दोन वेळा बायोमेट्रिक घेण्याची सक्ती केल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुकानात कित्येक तास बसून राहण्याची परिस्थिती स्वस्त धान्य दुकानदारांवर आली आहे. त्यामुळे सदर दोन वेळा अंगठा लावण्याची सक्ती रद्द करावी व प्रत्येक महिन्याला रेशन दुकानदारांचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महादेव दळवी यांनी केली आहे.