Death is not the biggest loss in LIFE. The biggest loss is when relationships die among us while we are alive…
या ओळी वाचल्या आणि गीतेतल्या पहिल्या अध्यायातल्या काही श्लोकांची आठवण झाली. माणूस जन्माला येतो तेव्हा तो एकटा जन्माला येत नाही तर तो जन्माला आल्याबरोबर अनेक नाती घेऊन येतो. कोणीतरी मामा होतं. कोणीतरी काका होतं तर कोणी काकी, कोणी मावशी. या नात्यांचे जसे जन्म आपल्याबरोबरच होतात ते आपल्याला आयुष्यामध्ये कौटुंबिक सामाजिक गोष्टींचे भान देतात. आपल्याला एखाद्या घरात जन्म मिळणार ही तर खऱ्या अर्थाने पूर्वकर्माची फळं असतात. पण त्याचबरोबर आपल्या कर्माचा जो जो भाग आपल्याला देणे-घेणे म्हणून राहिलाय ते देणारे किंवा घेणारे आपल्या बरोबरच नात्यांच्या रुपात जन्माला येत असतात. या सगळ्याचा अनुभव कधी चांगला तर कधी वाईट असा येत असतो. आणि आपलं जगणं पुढे पुढे जात असतं. काही नाती मायेची पांघरूणं घालतात तर काही नाती वैराचे आसूड घेऊन आपल्यासमोर उभी ठाकतात. या सगळ्याचा तोल राखतच आपण पुढे पुढे जात असतो. काही नाती रक्तांनी निर्माण होतात तर काही नाती ही आपल्या स्वभावामुळे, आपल्या संबंधांमुळे योगायोगाने निर्माण होतात. बऱ्याचदा असे लक्षात येते की रक्ताची नाती ही थोडीशी कमी भरतात या बाकीच्या नात्यांपेक्षा आणि म्हणूनच आपल्या विवाहानंतर निर्माण झालेले जे नातेसंबंध असतात ती नाती आपल्याला जास्त जवळची वाटतात. आपले सहकारी कधी आपल्याशी अतिशय प्रेमाने वागतात तर कधी उभा दावा मांडल्यासारखे एकमेकांच्या समोर आले की वादावादी घालतात. खरंतर या सगळ्dयांच्या पत्रिका मांडल्या जातात. या पत्रिकेप्रमाणे ग्रह जुळतात किंवा जुळतही नसतात पण जुळवले जातात. अशावेळी 30-40 वर्षाच्या संसारानंतर बरेचदा आपल्या लक्षात येतं की आपलं आणि आपल्या सहचाऱ्याचं अजिबात जुळत नाही किंवा पटत नाही पण संसार आपला चालतो. आणि यानंतर मात्र एकमेकांच्या मनामध्ये काही वेळेला अढी निर्माण होते. पण काही जोड्या या पूर्वकर्मानुसार प्रेमासाठीच जन्माला आलेल्या असतात. मग त्यांचं प्रेम हे शेवटपर्यंत अखंड राहतं, अगदी एखादा निघून गेला तरी. अशी अनुभूती आपल्याला बऱ्याचदा येते आणि जाणाऱ्याचे दु:ख करण्यापेक्षा राहिलेल्यांनी त्या आनंदाच्या क्षणांना पुन्हा पुन्हा जगायचं असतं, हे मात्र लक्षात येतं. एखाद्याच्या आठवणीने व्याकुळ होणं अगदी स्वाभाविक आहे, परंतु त्या माणसाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं होतं याची जाणीव मात्र त्याच्या जाण्याने होते. व्यक्तीच्या जन्मामुळे आपण मावशी झालेलो असतो, मामा, आत्या झालेलो असतो. तो हुद्दा आपल्याजवळ कायम राहतो. त्या नात्यांमध्ये सगळ्या आठवणींची एक सुंदर विणलेली शालच आपल्या जुन्या पैठणीसारखी असते. त्या नात्याचं वस्त्र आपल्याजवळ असणार हीच आपल्यासाठी श्रीमंती असते. ते वस्त्र पाहताना नेमकं काय हरवले आणि मिळवले याची बेरीज वजाबाकी मनामध्ये अखंड चालू असतेच, पण आपण जन्माला येतानाच ठराविक श्वास म्हणजेच ठराविक दिवस मोजून आलेलो असतो. त्याची कुणाजवळच नोंद नसते किंवा आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण ही गोष्ट सोईस्कररित्या विसरून जातो आणि मग कुणाच्यातरी जाण्याने आपल्याला एकदम या गोष्टींची आठवण व्हायला लागते.