ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्या मुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्लीत त्यांच्या भेटीला गेले आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाहीत. कारण शिवसेनेचे हायकमांड मुंबईत आहेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
पक्ष बांधणीसाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ते आता शिवसेनेचे नाहीत. विधिमंडळात त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्त्व नाही, हे खरं आहे. ते भाजपात मनानं, तनानं विलीन झाले आहेत. धनानं तर कधीच विलीन झाले आहेत. त्यांना सेनेत रहायचं नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यांनी इतरांना भरकटवू नये. दम असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडून लढवावी.
हेही वाचा : एलन मस्क यांनी का रद्द केला ट्विटर खरेदी करार?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री हा भाजपचा आहे. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्लीत हायकमांडच्या भेटीला गेले आहेत. सेनेचा हायकमांड मुंबईत आहे. त्यामुळे सेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाहीत, असा टोलाही राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.