ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो पण निवडून येऊ की नाही, याची त्यांना धाकधूक आहे. कारण त्यांना आत्मविश्वास नाही. त्यामुळे ईडी, सीबीआयचा वापर करुन विरोधकांना त्रास द्यायचा. त्यांची पक्ष फोडायचे. त्यांची घरंही फोडायची, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपची खरडपट्टी काढली. अरे मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपाला दिलं.
उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावती येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद दिल्यावरुन भाजपवर निशाणा साधला. भाजपने राष्ट्रवादीच्या काही आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामधील अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यासारख्या नेत्यांना मंत्री केलं. भाजपने या नेत्यांवर केलेले आरोप खोटे होते किंवा भाजपने त्यांना गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले. नक्की काय केलं हे तरी सांगा आम्हाला. काय शिंपडताय त्यांच्यावर? गोमूत्र शिंपडताय का? का चौकशा थांबल्या त्यांच्या. याचं उत्तर भाजपने द्यावं.
संत रामदास स्वामी म्हणायचे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण आज भष्ट्र तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, असा भाजपचा एक अजेंडा झाला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.