पक्षाच्या स्थितीमुळे पंतप्रधान मोदींकडून वारंवार प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार दौऱयाबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींना वारंवार गुजरातमध्ये जाण्याची काय गरज आहे? भाजप घाबरला आहे. भाजप स्वतःला शक्तिशाली समजत असल्यास पंतप्रधानांना वारंवार गुजरातमध्ये का यावे लागतेय? गुजरातमध्ये भाजप पराभूत झाल्यास त्यामागे महागाई अन् बेरोजगारी ही कारणे असतील असा दावा गेहलोत यांनी केला आहे.
महागाई अन् बेरोजगारीमुळे गुजरातची स्थिती बिकट झाली आहे. यंदा गुजरातमध्ये सरकार बदलल्यास पूर्ण देशात याचा लाभ होणार आहे. गुजरातमध्ये पराभव झाल्यावर पंतप्रधान मोदींना महागाईची तीव्रता लक्षात येईल. त्यानंतर महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ते काही पावले उचलतील. भाजपसाठी पंतप्रधान मोदींचे नावच पुरेसे असल्यास ते वारंवार गुजरातमध्ये का येत आहेत असे प्रश्नार्थक विधान करत गेहलोत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
उत्तरप्रदेशात भाजपने निवडणुकीत विजय मिळविल्यापासून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नियमित स्वरुपात गुजरातमध्ये येत आहेत. याचा अर्थ गुजरातमध्ये भाजप संकटात असल्याचे त्यांचे मानणे आहे. दोन्ही नेते दर आठवडय़ाला गुजरातमध्ये येत असल्यास भाजप कमजोर स्थितीत असल्याचे संकेत मिळतात असे गेहलोत यांनी म्हटले आहे.