ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप हा गंगेसारखा पक्ष आहे. त्यामध्ये डुबकी मारल्यास पापांची मुक्तता होईल, असे सांगत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) यांनी विरोधकांना खुली ऑफर दिली आहे.
त्रिपुरामध्ये आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर जनविश्वास रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा भाग म्हणून दक्षिण त्रिपुरातील काकराबन येथे एका जाहीर सभेला माणिक साहा यांनी संबोधित केले. ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. त्यामुळे जे अजूनही स्टॅलिन आणि लेनिन यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात त्यांनी भाजपात यावे, असे मी त्यांना आवाहन करतो. भाजप हा पक्ष गंगेप्रमाणे आहे. डुबकी मारल्यास सर्व पापं धुवून टाकली जातील. भाजपच्या रेल्वेचे डबे अजून रिकामे आहेत. त्या डब्यांमध्ये विरोधकांनी बसावं. पंतप्रधान मोदी तुम्हाला जिथं असणं गरजेचं आहे, तिथे घेऊन जातील.
त्रिपुरामध्ये भाजप सरकारने 2018 पासून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनविश्वास रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील 60 मतदारसंघांचा समावेश असेल. शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या रॅलीला संबोधित करणार आहेत.