एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली त्यागाची भूमिका : प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे
प्रतिनिधी / म्हापसा
भारतीय जनता पक्षाने कोणत्याही परिस्थितीत जाऊन मुख्यमंत्रिपद हिसकावून घ्यावे, असे कधी केले नाही. पूर्वी स्थापन झालेले महाराष्ट्राचे सरकार आहे ते अनैसर्गिक आहे, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटले. म्हणून भाजपचा पाठिंबा घेऊन एकनाथ शिंदेंचे सरकार आज महाराष्ट्रात होत आहे. लोकांना वाटत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, तशी जनतेचीही इच्छा होती. मात्र त्यांनी आपण सत्तेच्यामागे नाही हे दाखवून दिले आहे. एक चांगले विकास करणारे सरकार महाराष्ट्रात यायला हवे म्हणून फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून आपला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
…तर महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्तेवर असती
ज्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपा सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. पण त्यावेळी भाजपला सत्तेपासून रोखून धरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना यांची अनैसर्गिक युती झाली. खरे म्हटले तर युती होती ती भाजपबरोबर. शिवसेनेने भाजप बरोबर युती केली नसती तर त्यावेळी भाजपला स्वबळावरच महाराष्ट्रात सत्ता मिळाली असती. जनतेने भाजपला पसंती दिली होती. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी जे काम करून दाखविले, त्यासाठी त्यांना जनतेने पसंती दिली. पण आकडय़ामुळे ते सत्तेपर्यंत पोचू शकले नाही. मात्र शिवसेनेने आपल्यास मुख्यमंत्रिपद मिळायला पाहिजे म्हणून भाजपबरोबर युती तोडली व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी अनैसर्गिक युती केली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण ते गेली अडीच वर्षे कुठल्याच घटकाचे समाधान करू शकले नाही. ना शेतकरी ना सामान्य नागरिक ना समाजाला त्यामुळे ठाकरे सरकारविषयी अस्वस्थता राहिली व ती प्रगटही झाली. त्यातील काही गट बाहेर आले व आज एकनाथ शिंदे ज्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपण त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त करताना सांगितले. आज भाजप पाठिंबा देऊन सरकार घडते याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
पंचायत निवडणूक प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत!
उच्च न्यायालयाने पंचायत निवडणुका 45 दिवसांच्या आत घ्याव्या, असा निर्णय दिला. त्याचे आम्ही स्वागत करतो. जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुका आम्ही जिंकल्या व आगामी पंचायत निवडणूकही जिंकणार हे माहीत आहे. आम्ही उद्या निवडणुका झाल्यास त्यासाठी सज्ज आहोत. आम्ही घाबरून मागे राहिलो नाही उलट पूर्णतः आरक्षण वॉर्ड राखीवता करूनच पंचायत निवडणुका व्हाव्यात म्हणून आम्ही निवडणुका पुढे जाव्यात, अशी मागणी करीत होतो. मात्र काही प्रसारमाध्यमांनी आम्ही निवडणुकीसाठी घाबरलो, असे अग्रलेख लिहिले. ऐन पावसात मतांची टक्केवारी कमी होऊ शकते व राखीवता न ठेवता न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे सर्व जागेवर बसवून निवडणुका व्हाव्यात, यासाठी आमचा आटापिटा होता. मात्र ऐन पावसाळय़ात न्यायालयाने निवडणूक घेण्याचा निर्णय कोणत्या आधारे दिला? हे प्रश्नचिन्ह आहे. मात्र न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य करावाच लागेल. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप निवडणूक जिंकतो, पण घाबरून पाठीमागे रहायला पाहतो, असे अनेक जणांचे आपण अग्रलेख वाचले. भाजप घाबरून पाठी राहिला नाही. ज्यावेळी असा निर्णय दिला गेला की परत ओबीसी सर्वेक्षण करायला पाहिजे व असाही आदेश आला की आरक्षण शिवाय निवडणूक घ्याव्यात. तेव्हा भाजप व आम्हाला दिसले की कुठल्याही घटकावर अन्याय होऊ नये. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. आम्ही अजिबात घाबरलो नाही, उलट आम्ही निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार आहोत. मात्र उच्च न्यायालयाने तो आदेश दिल्याने न्यायालयाचा आदेश मान्य करावाच लागेल, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी म्हणाले.
निवडणुकीला फक्त 45 दिवस उरले आहेत. त्यामुळे थोडी गडबड होणार. न्यायालयाने निर्णय देताना हा विचार करायला हवा. पावसाचे दिवस आहे. उलट लवकर झाल्यास आम्हाला फायदा होता, मात्र राखीवतेसह निवडणुका व्हाव्यात अशी भजपची भूमिका होते. मात्र न्यायालयाने आपला आदेश दिला. सध्या पावासाचे दिवस आहे. मतदानावेळी मोठा पाऊस पडला तर मतदानावर परिणाम होणार. पंचायत पातळीवर 95 टक्केही मतदान होते. टक्केवारीला महत्त्व असते व राखीवताही पंचायत पातळीवर गणली जाते. पाऊस असल्यास 70 ते 80 टक्के मतदान होणे मुश्किल आहे, असे ते तानावडे म्हणाले.
दुसरा खुर्चीवर बसल्यावर त्याला बेकायदेशीर दिसल्यास तो कारवाई करणारच
कुणाचा व्यवसाय कायदेशीर असेल कारवाईचा प्रश्नच येत नाही. जर सत्तेच्या जोरावर बेकायदा कामे करावी व त्याला माफी मिळावी, हे आपल्याला पटत नाही. आपले काम कायदेशीर असेलतर त्यांनी ते सिद्ध करावे, अशी प्रतक्रिया प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.
लोबोंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही!
विरोधी पक्ष नेते मायकल लोबो भाजपमध्ये प्रवेश करू इच्छीत असल्यास, प्रथम आपण प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रथम आपल्याकडे प्रस्ताव येतो. कुणीही केंद्रात जरी संपर्क साधला असला तरी प्रवेश देण्यापूर्वी त्याची माहिती आपल्यास दिली जाते. प्रदेशाध्यक्ष म्हणून अद्याप मला काहीच माहिती नाही, असी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली.