ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) आणि भाजप (BJP) यांची युती युती तुटली आहे. थोड्याच वेळात याबाबत घोषणा केली जाणार आहे. नितीश कुमार हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. तर नितीशकुमार काँग्रेस आणि आरजेडी बरोबर युती करणार असल्याची माहिती आहे. लवकरच JDU, काँग्रेस आणि RJD मिळून नवे सरकार स्थापन करणार आहेत.
भाजप आणि नितीशकुमार यांच्यात दुरावा वाढत होता. सध्या नितीश कुमार आणि भाजपचे संबंध तुटण्याएवढे ताणले गेले होते. अखेर नितीशकुमार यांनी भाजप बरोबर असणारी युती तोडली आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी आघाडी करणार आहे.
भाजपसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी ११ वाजता जेडीयूच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. जेडीयू पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन यांनी सोमवारी ही माहिती दिली. बिहारमधील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली होती. तर या बैठकीत भाजपबरोबरची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीशकुमार लवकरच नव्या युतीची घोषणा करणार आहेत.
हे ही वाचा : बिहारमध्ये राजकीय समीकरणं बदलणार? नितीशकुमार भाजपची साथ सोडण्याची शक्यता
नितीश कुमार राज्यपालांना भेटणार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांयकाळी ४ वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द करणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर महागठबंधन सरकारचा नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.