ऑनलाईन टीम / जयपूर :
रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता, असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (gulabchand kataria) यांनी केले आहे. त्यावर वल्लभनगर विधानसभेचे माजी आमदार रणधीर सिंह भींडर (randhir singh bhindar) यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कटारिया यांच्यावर निशाणा साधला आहे.
भींडर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कटारिया म्हणतात की, रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. त्याने काही मोठा गुन्हा केला नाही. सीतेचे अपहरण एक सामान्य विषय होता. जर रावणाने सितेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता.
दरम्यान, भींडर यांनी कटारिया यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कटारिया हे रावणाचेच अनुयायी आहेत. यामुळेच भगवान राम, महाराणा प्रताप आणि आंबेडकरांविरोधात बोलतात. व्यक्तिचे बोलणेच त्याचे चरित्र कसे आहे, हे दाखवते. आता आम्हाला समजायला लागले आहे की, ते हिंदू आणि मेवाडी नाही तर श्रीलंकेतून आले आहेत. त्यांना त्यांचा आदर्श पुरुष रावणाला भेटण्यासाठी तिथेच पाठवून द्यायला हवे, असे भींडर यांनी म्हटले आहे.