ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) झेड प्रोटेक्टेड असतानाही त्यांच्या गाडीवर हल्ला होतो म्हणजे पोलिसांच्या संरक्षणामध्ये सुरू असलेली ही गुंडशाही आहे. लोकशाही पायदळी तुडवण्याचाच हा प्रकार आहे. पण भाजप घाबरणारी नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी आपण होम सेक्रेटरी (home secretary)आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिणार असून, जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्या यांनी खार पोलीस स्टेशनला ऑफिशियल कळविले होते की, मी राणा दाम्पत्याला भेटायला येत आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये त्यांची भेट झाल्यावर सांगितले की, 70 ते 80 जणांचा जमाव बाहेर आहे आणि तो जमाव माझ्यावर हल्ला करणार आहे. त्या संदर्भात अगोदर क्लिअरन्स करा, त्यानंतर मी बाहेर जाईन. एवढ क्लिअर सांगितल्यानंतर देखील पोलिसांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला शिवसैनिकांना परवानगी दिली. म्हणजे पोलिसांच्या संरक्षणामध्ये सुरू असलेली ही गुंडागर्दी आहे.
मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवलेली आहे. देशातील सर्वोत्तम पोलीस यंत्रणा आज दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागत आहे. लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. त्यावर मी उद्या गृहमंत्री आणि सचिव यांना पत्र लिहणार आहे.या प्रकरणातील पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे.