ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात रणकंदन सुरू आहे. असे असतानाचे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रतापगडावर आज 363 वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढाही होते. यावेळी बोलताना लोढा म्हणाले, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्य्रामध्ये किल्ल्यात बंद करुन ठेवले होते. त्यावेळी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. तसे एकनाथ शिंदेंना बाहेर पडू न देण्यासाठीही अनेक प्रयत्न झाले, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर आले असे म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्य्रातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली आहे.
अधिक वाचा : सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले?; राणेंचा सवाल
लोढा यांच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला ठिणगी पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी लोढा यांचा समाचार घेतला आहे. एकाला ठेच लागल्यानंतर दुसरा शहाणा होतो, पण यांच्यामध्ये शिवरायांचा अपमान करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसते. महाराजांची तुलना कधी होऊ शकते का? अशीही विचारणा करत अजित पवारांनी या वाचाळवीरांना आवरा, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला. तर लोढा यांचे हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे, अशा आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली.