शिवसेना, काँग्रेस, वंचित, प्रहार हे कोणा बरोबर आघाडी करणार ?,
एल के सरतापे/ म्हसवड
माण खटाव तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हसवड पालिका म्हसवड नगरपालिका ज्या पक्षाकडे त्यापक्षाचीच सत्ता दोन्ही तालुक्यातील नगरपंचायत, मार्केट कमिटी आदी ठिकाणची सत्ता राहत असते. त्यामुळे पालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू म्हसवड ठरत आला आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे लक्ष म्हसवडच्या राजकारणावर फिरत असते. पालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच पक्षीय राजकारणाला गती आली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, रासपा, वंचित बहुजन आघाडी, प्रहार ह्या प्रमुख पक्षात कडवी झुंज पहावयास मिळणार असली तरी छोटे छोटे पक्ष कोणती भूमिका घेतात. स्वतंत्र लढणार, कोण कोणा बरोबर युती करतोय, कोण कोणा बरोबर सेटलमेंन्ट करतोय, कोण पक्ष बदलणार, कोण चाली बदलणार हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यावरच समजणार असले तरी खरी टस्सल होणार ती भाजप-राष्ट्रवादीमध्येच.
पाणी प्रश्नावरच आजपर्यंतच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. पण म्हसवडच्या पाणीप्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीत फक्त रोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन द्यायचे व निवडून आल्यावर मात्र पहिले पाढे पंचावन हे प्रत्येक राजकारणी करत आला आहे. मात्र यावेळी कमिशन खाऊ नगरसेवकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत म्हसवडकर जनता दिसत आहे. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या व विरोधी बाकावर बसलेल्या नगरसेवकापैकी कोण कोण पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कित्येक दिवसांपासून नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले पुन्हा निवडणूक पुढे जाते की काय या संभ्रमतेमुळे बुचकळ्यात पडले आहेत.
म्हसवडचे राजकारण म्हसवड शहर व बारा वाडय़ा बारा खेडय़ाभोवती फिरत असते. म्हसवडची राजकीय परंपरा असून बापु, आबा, काका, आण्णा, दादा, नाना, भाऊ, अप्पा या टोपन नांवाच्या बरोबर आत्ता ओ शेठ हे ही टोपन नाव राजकारणात आवडीने घेतले जात आहे. म्हसवड पालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, जेष्ठ नेते अजितराव राजेमाने, प्रा. कविता म्हेत्रे, युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, किशोर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भोसले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मदने, राहुल मंगरुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, रासपचे आप्पासाहेब पुकळे, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले, उपाध्यक्ष अंगुली बनसोडे, शहराध्यक्ष शहाजी लोखंडे, प्रहारचे अरविंद पिसे, या बरोबर म्हसवडमध्ये आज हि विलासराव माने, विजय सिंन्हा, विजय धट, धनाजी माने, कैलास भोरे, भगतसिंग विरकर, बाळासाहेब माने यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
पालिका निवडणुकीत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे हे कमळ या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित झाले असल्याने अनेक नवे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले असले तरी जुने हि मी पुन्हा येणार म्हणून गर्जना करु लागले असले तरी भाजपाचे आ. गोरे यांना मुस्लिम, बौध्द, मातंगसह मागासवर्गीय भाजपा उमेदवारास मतदान करणार का? मुस्लिम व बौध्द धर्मियांना उमेदवारी देणार का? हा कळीचा मुद्दा असुन मी भाजपा मतदान कधीच केले नाही व करणार नाही. उमेदवारीवर लांब असे म्हणणारेच आत्ता भाजपाच्या उमेदवारीसाठी पायघडय़ा घालत आहेत. मुस्लिम व बौद्ध या दोन्हीकडे भाजपाच्या नावाने उमेदवार उभा करणार कि रासपा किंवा अन्य पक्षाबरोबर युती करुन लढणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. निवडणूक बहुरंगी होत असली तरी भाजपा व राष्ट्रवादी या दोघामध्येच खरी लढत होणार आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीनंतर अनेक घडामोडी झाल्या. काँग्रेसमधुन आ. गोरे भाजपात गेले मात्र त्याच्यामागे आज जे त्याचे नगरसेवक म्हणून मिरवतात ते भाजपात गेले नाहीत. तसेच त्यांचे बंधू शेखर गोरे हे राष्ट्रवादी पक्षात होते त्यांनी राष्ट्रवादीत असताना माणमध्ये आ. गोरे यांना अनेक ठिकाणी ब्रेक लावून म्हसवड पालिकेप्रमाणे दहिवडी, वडुज नगरपंचायत, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी सोसायटय़ा ग्रामपंचायतमध्ये शेखर गोरे यांनी सत्तांतर घडवून आणले होते. त्यांनी हि राष्ट्रवादीला राम राम करत धनुष्यबान हातात घेतला तर तात्या असताना गटागटाचे लागलेले पक्षाला ग्रहण प्रभाकर देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यावर सुटले. मात्र काही कट्टर राष्ट्रवादी असलेले नेते सध्या आ. गोरे यांच्या संपर्कात असुन अनेक निवडणुकात त्यांनी विरोधकांना मदत करत पक्षाची प्रतिमा मलिन केल्याची चर्चा मार्केट कमिटी व जिल्हा बॅँक निवडणुकीत दिसून आल्याने येणाऱया निवडणुकीत आ. गोरे यांच्या गळाला राष्ट्रवादीचे कोण कोणते मासे गळाला लागतात हे या महिनाअखेर चित्र स्पष्ट होईलच. देशमुख साहेब म्हसवडमधील राष्ट्रवादीतील असलेले तिन गट एकत्र आणुन निवडणूक लढवणार कि फुटून फुटून लढणार हे हि चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
गतवेळी आ. गोरे यांनी रासप व शिवसेना यांना बरोबर घेतले होते. यावेळी रासपचे संस्थापक माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी सर्व निवडणुका स्वतंत्र स्वपक्षावर लढवण्याची दोन महिन्यापूर्वी घोषणा केली. मात्र कार्यकर्ते स्वतंत्र लढण्यास इच्छूक दिसत नसल्याने अनेक पदाधिकारी आ. गोरे यांच्याबरोबरच युती करुन निवडणूक लढवणार असल्याचे बोलत आहेत. यावर जानकर साहेब काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हसवड मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वेगळा मतदार असला तरी म्हसवड मध्ये काँग्रेस स्वबळाचा नारा देवू शकत नाही कोणा बरोबर मॅनेज होऊन समाधान मानणार कि लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वंचित बहुजन आघाडी निवडणुक लढवणार असे जाहिर केले असले तरी वंचितांचा वेगळा मतदार आहे तो कोणाबरोबर युती करुन पालिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे तर सध्या शिवसेनेची अवस्था तसी गंभीरच आसुन गेल्या निवडणुकीत सेनेचे दोन गट झाले होते यावेळी काय होणार वरिष्ठ पातळीवर बंडखोरी चे लागलेले ग्रहण कोणा बरोबर युती करून शिवसेना आपले अस्तित्व दाखवणार ? आ बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने दोन वर्षापासून निवडणुकीची पेरणी अरविंद पिसे यांच्या माध्यमातून केली आसुन पाणी घरकुल आदी प्रश्नावर आंदोलन करुन लोकात गेलेला प्रहार स्वतंत्र लढणार कि भाजपा बरोबर युती करून निवडणुकीला सामोर जाणार हे लवकरच समजणार आसले तरी येणारी पालिका निवडणुक भाजपा व राष्ट्रवादी यांच्यातच होणार आसुन बाकीचे कोण कोणा बरोबर युती करणार यावरच उमेदवारी ठरणार ऐवढे मात्र खरे