आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे विधान
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
एआययुडीएफचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या विवाहावरून वादग्रस्त टिप्पणी केली होती. पूर्वी हिंदू पुरुष बेकायदेशीरपणे अनेक विवाह करत महिला जोडीदारांसोबत राहत होते असे अजमल यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर म्हणून आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मुस्लीम पुरुषांचा उल्लेख करत कठोर टिप्पणी केली आहे. मुस्लीम पुरुषांच्या बहुविवाहाच्या प्रथेला भाजपचा विरोध असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
एआययुडीएएफ प्रमुखाच्या कथित सल्ल्यानुसार महिला ‘20-25’ मुले जन्माला घालू शकतात, परंतु भविष्यात या मुलांच्या भोजन, कपडे आणि शिक्षणावर होणारा सर्व खर्च धुबरीच्या खासदारांना उचलावा लागणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.
मुस्लीम महिलांना न्याय
स्वतंत्र भारतात राहणाऱया पुरुषाला (पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता) तीन-चार महिलांशी विवाह करण्याचा अधिकार असू शकत नाही. आम्ही अशाप्रकारची व्यवस्था बदलू इच्छितो. मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला काम करावे लागणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ इच्छितो. आसामच्या हिंदू परिवारांमधील मुलेमुली डॉक्टर होत असतील तर मुस्लीम परिवारातूनही डॉक्टर व्हायला हवेत. परंतु अनेक आमदार स्वतःच्या ‘पोमुवा’ मुस्लीम मतांसाठी चुकीच्या प्रथांची पाठराखण करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. पूर्व बंगाल किंवा सध्याच्या बांगलादेशातील बांगलाभाषिक मुस्लिमांना आसाममध्ये ‘पोमुवा मुस्लीम’ म्हटले जाते.
काँग्रेसने साधला निशाणा
भाजप सरकार संवेदनशील विषयाला धर्माशी जोडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार घटनेची शपथ घेत असल्याने त्याने घटनेच्या कक्षेत राहून काम करणे अपेक्षित आहे. बहुविवाहाच्या प्रथेला भाजप अन्यायपूर्ण मानत असल्याने सरकारने याच्या विरोधात कायदा आणावा असे म्हणत काँग्रेस नेते रकीब उल हुसैन यांनी शर्मा यांना लक्ष्य केले आहे.
अजमल यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया
आसाममध्ये आमच्याकडे बदरुद्दीन अजमल यांच्यासारखे काही नेते आहेत, महिलांनी शक्य तितक्या मुलांना जन्म द्यावा असे अजमल यांचे सांगणे आहे. उत्तमप्रकारे पालनपोषण करता येईल इतक्याच मुलांना एखाद्या कुटुंबाने जन्म द्यावा असे मुख्यमंत्री शर्मा यांनी अजमल यांच्या वादग्रस्त टिप्पणींवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
सर्वांची प्रगती व्हावी
आमच्या सरकारचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही स्वदेशी लोकांसाठी काम करतो. परंतु आम्ही सर्वांची प्रगती इच्छितो. मुस्लिमांचे मुले विशेषकरून ‘पोमुवा’ मुस्लीम मदरशांमध्ये शिकून ‘जोनाब’ आणि ‘इमाम’ व्हावेत अशी आमची इच्छा नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व मुस्लिम मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी सामान्य शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा या मताचे असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.