ऑनलाईन टीम/तरुण भारत
“जो निकाल राज्यसभा निवडणुकीत (rajyasabha election) लागला आहे तोच निकाल महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद भाजपचीच सत्ता येणार, तसेच मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार ” असं वक्तव्य खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आहे. त्या राजभवन येथे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर (BMC Election) प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा म्हणाल्या, “जो निकाल राज्यसभा निवडणुकीत लागला आहे तोच निकाल महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद भाजपचीच सत्ता येणार” असंही त्यांनी सांगितले. भाजपने ज्याप्रमाणे राज्यसभेत विजय मिळवला, त्याप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, गुप्त मतदान असल्याने शिवसेनेचे ५० टक्के आमदार भाजपला मतदान करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यपालांना भेटण्याआधी नवनीत राणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटल्या. फडणविसांच्या भेटींनंतर राणा दाम्पत्य राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. मात्र या भेटीपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, “राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत (BMC Election) मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहे”, असे त्यांनी सांगितले