वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभाव असणारा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडला असून आता त्याची भारतीय जनता पक्षाशी युती होण्याची दाट शक्यता आहे. अद्याप दोन्ही पक्षांनी या युतीसंबंधी स्पष्ट भूमिका घोषित केलेली नाही. मात्र, पडद्याआड जोरदार हालचाली होत असून त्यांचा परिणाम म्हणून रालोदने विरोधी आघाडीशी संबंध तोडले आहेत.
रालोदचे नेते जयंत चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करण्याचे संकेत मात्र दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करेल. सध्या या संबंधात आपण कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र, अधिकृत घोषणेनंतर, आपण विरोधी पक्षांच्या आघाडीशी नाते का तोडले, यासंबंधी सविस्तर बोलू, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
चार जागा मिळणार ?
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आल्यास चौधरी यांच्या पक्षाला लोकसभेच्या तीन ते चार जागा, एक राज्यसभेची जागा, केंद्रीय मंत्रिमंडळात एक पद आणि उत्तर प्रदेश सरकारमध्येही 2 मंत्रिपदे दिली जातील असा प्राथमिक प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली होती. तथापि, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विरोधकांवर का नाराजी ?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये झाली. तेव्हा समाजवादी पक्ष आणि रालोद यांच्यात युती होती. मात्र, युतीचा मोठा पराभव झाला. तेव्हापासून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्याकडे दुर्लक्ष चालविलेले आहे, अशी तक्रार जयंत चौधरी करतात. तसेच आपल्या पक्षाने पूर्वी भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. तशी आताही होऊ शकते, असाही संकेत त्यांनी दिला आहे. त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा येत्या एक-दोन आठवड्यांमध्ये शक्य आहे.