दिल्लीत वायू प्रदूषणाची स्थिती पुन्हा गंभीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. राजधानी दिल्लीत एक्यूआय पुन्हा एकदा अत्यंत खराब श्रेणीत पोहोचले आहे. अशा स्थितीत दिल्लीत सत्तारुढ असलेल्या आम आदमी पक्षाने भाजपला लक्ष्य केले आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय यांनी प्रदूषणासाठी भाजपला जबाबदार ठरविले आहे. शेजारील राज्यांमध्ये असलेल्या भाजप सरकारलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
पटाके फोडण्यात आल्यानेच प्रदूषण वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भाजप स्वत:ची जबाबदारी पार पाडू इच्छित नाही. फटाके फोडण्यात यावेत अशी भाजपची इच्छा आहे. तिन्ही राज्यांमध्ये (दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश) पोलीस भाजपच्या नियंत्रणाखाली आहेत असा दावा राय यांनी केला आहे. राय यांनी याचबरोबर भाजपवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अवहेलना करण्याच आरोप केला आहे. अनेक लोकांनी फटाके वाजविले नाहीत. परंतु ज्या क्षेत्रांमध्ये भाजपचा प्रभाव आहे, तेथे भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविल्याचा दावा आप नेत्याने केला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये आतिषबाजी
प्रदूषणाची धोकादायक पातळी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतरही दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आहेत. आतिषबाजीमुळे दिल्ली-एनसीआरच्या अनेक हिस्स्यांमध्ये सोमवारी सकाळी वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली होती. सोमवारी सकाळी एक्यूआय वाढून 445 वर पोहोचला होता.