पुणे / प्रतिनिधी :
आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेतल्यास हिंदी भाषिक मतदारांमध्ये मोठी नाराजी पसरेल. त्याचा फटका भाजप-शिंदेगट युतीला बसण्याची दाट शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अत्यंत सक्रिय राजकारणी आहेत. परंतु त्यांनी आपला संघर्ष कायम ठेवावा. आरपीआयचा मनसेला सोबत घेण्यास विरोध राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील मनसेला घेण्यास उत्सुक नाहीत, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मंगळवारी मांडली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते. ते म्हणाले, आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजप-सेना व आरपीआय युतीचा महापौर होणार आहे. अमित शहा यांनी मुंबई पालिकेत दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. राज ठाकरेंना सोबत घेतल्यास विशेषत: मुंबई मनपा निवडणुकीत मोठा फटका बसेल. राज यांची हिंदी भाषिक तसेच उत्तर भारतीय नागरिकांबाबत असलेली भूमिका आरपीआयला मान्य नाही. मुंबईत हिंदी भाषिक व उत्तर भारतीय मतदार मोठय़ा प्रमाणावर आहेत. राज यांना भाजपने सोबत घेतले, तरी आम्ही बाहेर पडणार नाही. याउलट आत राहून त्यांना बाहेर काढू, अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी केली.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंकडे आता सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकारणी आहेत. हे भाजप-सेनेचे सरकार पुढील अडीच आणि त्यापुढील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार फुटून एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. त्यामुळे शिंदे यांचीच खरी शिवसेना असून बाळासाहेबांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. सध्या बहुमताचे सरकार असल्यामुळे पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदेच्या बाजूने कौल मिळेल, असा विश्वास आहे.