भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा : निवडणुकीपूर्वी मोठे बॉम्ब फुटण्याचे संकेत, विचारांशी फारकत हीच उद्धव ठाकरेंची मोठी चूक
प्रतिनिधी/कोल्हापूर
Chandrashekhar Bawankule Visit In Kolhapur:राज्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट सरकार चांगले काम करत आहे. जनतेला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक त्यांच्याकडून होत आहे, त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसना उमेदवार शोधावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. लोकसभेसाठी 45 प्लस आणि विधानसभेसाठी 200 प्लसचे टार्गेट ठेवून तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेशाचे बॉम्ब फुटतील, असे सांगत बावनकुळे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याचे सूतोवाच केले.
भाजच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे प्रथम कोल्हापूर दौऱयावर आले. पक्षविस्ताच्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्ता संवाद, पदाधिकारी संवादासह विविध कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी शनिवारी सकाळी हॉटेल पंचशिल येथे पत्रकारांशीही संवाद साधला. भाजप नेते मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, पुण्याचे मुरलीधर मोहोळ, सत्यजित कदम, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, विक्रांत पाटील, माजी जि. प. सदस्य अशोक माने, महेश चौगले, राजवर्धन निंबाळकर, राहुल देसाई, जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, अमोल पालोजी, संजय सावंत, डॉ. आनंद गुरव आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीमुळे राज्यात येणारे प्रकल्प गेले
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये काही प्रकल्प गेले. त्यावरून पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारले असता, ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे प्रकल्प गेले. ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात फिरकत नाही, अशा राज्यात गुंतवणूक करण्यासाठी कुणी गुंतवणूकदार येईल काय?. प्रकल्प जाण्याचे खापर शिंदे, फडणवीस सरकारवर फोडणाऱयांनी माहिती अधिकारात अर्ज करून माहिती घ्यावी सर्व काही कळेल. ठाकरे, पवार यांनी मुदतीत त्रुटी पूर्ण न केल्याने ऊर्जा प्रकल्प गेला, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रा काँग्रेस नेत्यांच्या मुलांकडून हायजॅक
राहुल गांधी यांची राज्यात आलेली भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या स्थानिक नेते, त्यांच्या मुलांनी हायजॅक केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता दुखावला आहे. तो भाजपकडे येत आहे. सातारा जिल्हय़ात शुक्रवारी 1200 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेलेला प्रवेश हे त्याचे उदाहरण आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत काँग्रेंसच्या काही नेत्यांना सेटल केल्याने सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता अस्वस्थ आहे. त्यातूनच तो भाजपकडे वळत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
विचारांशी फारकत हीच उद्धव ठाकरे यांची मोठी चूक
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनमताचा अनादर करत मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्यांच्यावर शरद पवार यांच्या विचाराचे गारूड आहे. हिंदूत्वावादी विचारांशी घेतलेली फारकत ठाकरे यांची सर्वात मोठी चूक होती. हीच गोष्ट न पटल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी आणि बारा खासदारांनी उठाव केला. आता खासदार गजानन किर्तीकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यानेही ठाकरे यांची साथ सोडली आहे. विचाराच्या फारकतीमुळेच शिवसेनेचे कार्यकर्तेही ठाकरेंपासून दूर जात आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
मविआ सरकारला मोदी सरकारचे वावडे
महाविकास आघाडीच्या काळात केंद्रीय योजनांना कात्री लावण्याचा प्रकार घडला, पंतप्रधान मोदींचे त्यांना वावडे होते, पण राज्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट सरकार आता याची भरपाई करत आहे. राज्यातील जनतेला न्याय देत असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे भाजपची ताकद आहे, तेथे कोणाचाही पक्षप्रवेश होणार नाही. भाजपमध्ये शिवसेनेचा शिंदे गट विलीन होणार नाही, तर निवडणूक आयोगाकडून सर्वाधिक संख्येच्या बळावर शिवसेना शिंदे गटालाच न्याय मिळेल. धनुष्यबाण चिन्हही त्यांना मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
इतिहासाला डॅमेज करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही
प्रतापगड येथील अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण राज्य सरकारने हटवले. त्याचप्रमाणे विशाळगड परिसरात असे घडले असेल तर त्याची दखल घेतली जाईल. गड, किल्ले जपले पाहिजेत, शिवकालीन इतिहास जपण्यासाठी इतिहासाला डॅमेज करण्याचे प्रकार खपवून घेणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पक्षातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असे म्हणत आहेत. पण त्यांनी हिम्मत असेल तर विश्वास ठराव आणावा, आमच्या सरकारचे बहुमत 164 आहे, ते 184 होईल. दोन्ही काँग्रेसचे आमदार आम्हाला मतदान करतील, काही गैरहजर राहतील, असा इशारा बावनकुळे यांनी जयंत पाटील यांना लगावला.
‘लव्ह जिहाद’ प्रकरणांची वस्तुस्थिती तपासणार
राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. याविषयी छेडले असता बावनकुळे म्हणाले, हिंदू मुलींना नियोजनबद्धरित्या जाळय़ात ओढण्याचे प्रकार घडत आहेत. 99.99 टक्के प्रकरणात असे प्रकार आढळतात. याबाबत गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट आहेत. अमिष दाखवून भुरळ घालून होणाऱया या प्रकारांना आळा बसला पाहिजे. कोणत्याही मुलीची फसवणूक होऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले….
- शिंदे, फडणवीस जनतेसाठी 18 तास कार्यरत जोडी.
- काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही.
-इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येणार असतील तर स्वागत
-ठाकरे गटाची अवस्था एक दिल के तुकडे हुए हजार.. कोई यहा गिरा…सारखी
-उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे संविधान स्वीकारणेच आता बाकी आहे.
-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱया शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाणे अमान्य.
-जितेंद आव्हाडांचा इतिहास सर्वांना माहित आहे.
-धनुष्याबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला मिळेल.
-धर्मांतर विरोधी कायद्याबाबत सरकार निर्णय घेईल.