ऑनलाईन टीम/तरुण भारत
निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा (nupur sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने सावध पवित्र घेतला आहे. आता टीव्ही डिबेट्समध्ये जाणाऱ्या नेत्यांसाठी आणि प्रवक्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. जो कोणी प्रवक्ता, नेता चर्चेला जाईल तेंव्हा त्याला नियमांचे पालन करावे लागेल. तसे न केल्यास पक्षशिस्तीचे उल्लंघन मानले जाईल आणि कारवाई केली जाईल. भाजपच्या (BJP) सूत्रांनी या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली आहे. चर्चेदरम्यान कोणताही धर्म, त्याची चिन्हे आणि प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह काहीही बोलू नये, असे स्पष्टपणे प्रवक्त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. चर्चेदरम्यान त्यांनी भाषेची सीमा ओलांडणे टाळावे, अशा सक्त सूचना प्रवक्त्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रवक्त्यांनी चिथावणी देणारी वक्तव्य टाळावी
भाजपने पक्षाच्या प्रवक्त्यांना चर्चेदरम्यान चिथावणी देणारी वक्तव्य टाळण्यास सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी देऊन पक्षाच्या विचारसरणीचे आणि आदर्शांचे उल्लंघन करू नये, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याशिवाय, प्रवक्त्यांना टीव्हीवर जाण्यापूर्वी हा विषय तपासण्याचा आणि त्यासाठी पूर्ण तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे करत असताना पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. चर्चेदरम्यान कोणाच्याही वादात पडू नका, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. विकासाच्या मुद्द्यावरच बोला. भाजपने प्रवक्त्यांना चर्चेदरम्यान समाज हित आणि विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यास सांगितले आहे. यावेळी बोलताना सरकारच्या कामगिरीची जास्तीत जास्त माहिती लोकांना द्या. भाजपने ८ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. याचीही माहिती लोकांना द्या, असे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच दिला होता सल्ला
यापूर्वी मे महिन्यात जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेला संबोधित करताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आमच्या नेत्यांनी भाषणावर नियंत्रण ठेवावे. विकासाच्या मुद्द्यांवर आपल्याला चिकटून राहायचे आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. लोक तुमची दिशाभूल करून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नुपूर शर्माने २६ मे रोजी एक टिप्पणी केली होती, ज्यावरून वाद निर्माण झाला होता. सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि यूएईसह सुमारे १५ मुस्लिम देशांनी या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर या आक्षेपांनंतरच भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.