ऑनलाईन टीम/तरुण भारत
Arvind Kejriwal on Anna Hazare Letter: ‘‘दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती’’, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले दहा वर्षांपूर्वीचे सहकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पत्र लिहून खडसावले आहे. यांनतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या पत्रावर केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय जनता पक्ष अण्णा हजारे यांना आमच्या सरकारविरोधात बोलायला लावत आहे,’ असा थेट आरोप केजरीवाल यांनी केला आहे. या निमित्तानं केजरीवाल यांनी भाजपसोबत अण्णांनाही लक्ष्य केलं आहे.
दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. हे धोरण राबविताना घोटाळा झाल्याचा आरोप करत सीबीआयनं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर व कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामुळं आप व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्ली सरकारच्या धोरणांवर टीका केली. दिल्ली सरकारच्या धोरणामुळं दिल्लीच्या गल्लीगल्लीत दारूचा सुकाळ होईल. त्यातून भ्रष्टाचार वाढेल,’ असं अण्णा म्हणाले होते. दारूच्या नशेत माणूस जसा धुंद होतो, तसेच केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद झाले आहेत, असंही अण्णांनी म्हटलं होतं.
अण्णा हजारे यांच्या या पत्रावर केजरीवाल यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. ‘जेव्हा-केव्हा आमच्याशी सामना करण्यासाठी विरोधकांकडे मुद्दे नसतात, त्यावेळी ते तिसऱ्याच व्यक्तीला आमच्याविरुद्ध उभे करतात. दिल्ली सरकारच्या विरोधात आता त्यांनी सीबीआयचा वापर करून पाहिला. मात्र, सीबीआयला आमच्या विरोधात काहीच सापडलेलं नाही. आम्हाला क्लीन चिट मिळतेय व लोकांचा पाठिंबा वाढतोय हे लक्षात येताच अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर निशाणा लावला जातोय. आम्हाला बदनाम करण्यासाठीच हे सगळं केलं जातंय, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी भाजपचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख स्पष्ट होता. भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधतानाच अण्णा हजारे यांचा राजकीय वापर होत असल्याचंही त्यांनी सूचित केलं.