पुणे / प्रतिनिधी :
कर्नाटकात जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाची मते काँग्रेसकडे वळल्यामुळेच त्यांना सत्ता मिळाली. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला पूर्वीप्रमाणेच चांगले यश मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
पुण्यात प्रथमच खासदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी विविध राजकीय मुद्यांवर मते मांडली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
जावडेकर म्हणाले, कर्नाटकच्या निकालात जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाची मते 6 टक्क्यांनी कमी झाली. ही कमी झालेली मते काँग्रेसला मिळाली, तर भाजपची मते कमी न होता 2018 प्रमाणेच कायम राहिली. कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असतो. जेडीएसची मते या खेपेला कमी झाली. ती का कमी झाली माहित नाही. मात्र, ही मते काँग्रेसकडे वळाली. त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या. कर्नाटकात मागच्या लोकसभेला आम्हाला 25 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल.
कसबा विधानसभेतील पराभवावर बोलताना जावडेकर म्हणाले, कसब्यात आत्तापर्यंत तिरंगी लढत व्हायची. यंदा दुरंगी लढत झाली. तिरंगी लढत असताना आमचा विजय व्हायचा. निवडणुकीत असे होतच असते. त्यामुळे पुढील निवडणुकीच्या वेळी आम्ही काळजी घेऊ, असेही जावडेकर यांनी सांगितले.