प्रेमानंद म्हांबरे यांची माहिती, पाच लाखाहून अधिक जणांनी घेतला योजनेचा लाभ
प्रतिनिधी /पणजी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ गोव्यातील 142937 रेशनकार्ड धारकांना आणि एकूण 543474 जणांना झाल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी दिली. या लाभधारकांशी भाजप कार्यकर्ते संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे सांगण्यात आले.
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हांबरे यांनी सांगितले की, कोरोना संकटकाळात अनेकांच्या नोकऱया गेल्या व व्यवसाय थंडावले. त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर अन्न योजना सुरू करून गरीब जनतेला मोठा दिलासा दिला. त्या योजनेची मुदत सरकारने वारंवार वाढवत नेली असून आता ती सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी योजना असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यासाठी मोदींना शाबासकी दिली.
या योजनेंतर्गत प्रति माणसी 5 किलो गहू, तांदूळ दिले जातात. तसेच मध्यंतरी तुरडाळ, चणाडाळही एक एक किलो देण्यात आली होती. हे अन्न धान्य मोफत असून देशभरात सुमारे 81.35 कोटी लोकांना त्याचा लाभ झाल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली.