तेलंगणात प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात भाजप
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून तेलंगणा राष्ट्र समितीचीच (टीआरएस) सत्ता राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत या पक्षाला भाजपचा सहकारी म्हणून पाहिले जात होते. परंतु आता के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष स्वतःला भाजपचा कट्टर विरोधक म्हणून सादर करत आहे. मागील वर्षी 30 ऑक्टोबर रोजी करीमनगर जिल्हय़ातील हुजूराबाद विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली असता त्याचा निकाल केसीआर यांच्या पक्षाला धक्का देणारा होता. भाजपचे उमेदवार एटाला राजेंद्र यांनी टीआरएस उमेदवाराला मोठय़ा फरकाने पराभूत केले होते.
भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ
2018 च्या निवडणुकीत टीआरएसला 59.34 टक्के तर भाजपला 0.93 टक्के मते मिळाली होती. 3 वर्षांमध्ये या मतदारसंघात भाजप 52 टक्के मतांपर्यंत पोहोचला आहे. जून 2021 मध्ये एटाला राजेंद्र हे टीआरएस सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री होते. त्यांना पक्षातून हाकलल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना हुजूराबादची उमेदवारी देत टीआरएस उमेदवाराला पराभूत केले.
टीआरएस अन् काँग्रेसमधून पलायन
मागील एक वर्षात टीआरएस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा सपाटा लावला आहे. केसीआर सरकार विरोधी भावना आणि काँग्रेसची दारुण अवस्था आपल्याला फायदेशीर ठरेल असे भाजपचे मानणे आहे.
2019 मध्ये भाजपकडून कमाल
टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस 2019 च्या निवडणुकीत तेलंगणात फारसे चमकले नाहीत. परंतु भाजपने 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून चकीत केले. टीआरएसला 9 तर काँग्रेसला 3 ठिकाणी यश मिळाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केसीआर यांची कन्या कवात यांना निजामाबाद मतदारसंघात भाजपचे अरविंद धर्मपुरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. अरविंद हे टीआरएसचे नेते डी. श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. धर्मपुरी यांच्या कविता यांनीच पक्षविरोधी कारवाया केल्याच आरोप केला होता. टीआरएसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे आदिलाबाद आणि करीमनगरमध्येही भाजपने विजय मिळविला.
निवडणूक जिंकण्याची तयारी
भाजपची मतांमधील हिस्सेदारी 2014 च्या 10.5 टक्क्यांच्या तुलनेत 2019 मध्ये 19.5 टक्के झाली आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीत 48 नगरसेवक भाजपने निवडून आणले आहेत. अशा स्थितीत भाजपने आता तेलंगणावर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप स्वतःचे बळ वाढवू पाहत आहे. भाजपने अलिकडेच स्वतःच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण यांना उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर पाठविले आहे.
केसीआर सरकार लक्ष्य
भाजपने मागील काही काळापासून राज्यातील केसीआर सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी प्रजा संग्राम यात्रा काढत टीआरएस सरकार शेतकऱयांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करत नसल्याचा आरोप केला आहे. भाजप आता राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका नेत्याची नियुक्ती करणार आहे. हे 119 वरिष्ठ नेते पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीकरता पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करणार आहेत.