ऑपरेशन कमळ-2 ची शक्यता ः गुजरात, हिमाचल, झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का देण्याची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगीम काळात होणाऱया विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला राजकीय मैदानात शक्तीहीन करण्याच्या रणनीतिवर भाजप काम करत असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने राज्यांचे प्रभारी महासचिव आणि प्रदेश शाखांना स्वतंत्र टीम तयार करत यावर काम करण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन लोटस पार्ट-2’ असे संबोधिण्यात येत आहे. यात गुजरात, हिमाचल, झारखंड समवेत काही राज्यांचा समावेश असणार आहे.
ज्या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तेथे निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्ष लढतीत नसल्याचे दाखविणारे वातावरण तयार केले जाणार आहे. याचमुळे भाजपचे नेते बिहार, झारखंड, हरियाणा यांच्यासह अनेक राज्यांमध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या या नव्या मोहिमेत गुजरात, हिमाचलमधील काँग्रेस आमदारावर नजर असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात भाजप अन्य राज्यांमध्येही ही मोहीम सुरू करू शकतो. गुजरात तसेच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला नव्याने झटका देण्याची तयारी आहे.
काँग्रेसमध्ये ज्या नेत्यांकडे राजकीय कौशल्य अन् चपळता होती, ते पक्षात बाजूला पडले आहेत. अशा नेत्यांना स्वतःमध्ये सामील करण्याची संधी भाजप शोधत आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडले आहेत. राज्यांमधील पक्षातील कलह सोडविण्यासाठी ते हस्तक्षेप करेपर्यंत उशीर झालेला असतो. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मते मिळवून देऊ न शकल्यास भाजप आक्रमकपणे काँग्रेसमध्ये फूट पाडू शकतो.
उत्तराखंडमध्ये पक्ष अडचणीत
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री हरक सिंह रावत यांच्या निवासस्थानी पक्षाच्या अनेक नेत्यांनी बैठक घेतली आहे. हरक सिंह रावत यांची सक्रीयता तसच पक्ष नेत्यांच्या बैठकीमुळे काँग्रेस नेतृत्वाच्या अडचणी वाढणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील कलह उघडपणे समोर आला ओ.
पन्नीरसेल्वम भाजपच्या वाटेवर
तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने सोमवारी माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व तसेच खजिनदारपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच इडापड्डी के. पलानिसामी यांची अंतरिम महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. जयललितांचे निष्ठावंत राहिलेले पन्नीरसेल्वम हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचे मानले जात आहे. शशिकला यांचा गट तयार झाल्यास त्याच्याशी भाजप हातमिळवणी करू शकतो.