काँग्रेसचा आरोप चरणसिंग सप्रा यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ पणजी
भाजपाचा राष्ट्रवाद बनावट असून, भाजपाचे राष्ट्रविरोधी लोकांशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप राष्ट्रवादाचा प्रचार करीत असला तरी त्यांचे संबंध आतंकवाद्याशी आहेत, असे सांगताना काँग्रेसचे केंद्रीय नेते चरणसिंग सप्रा यांनी काही फोटोही सादर केले. उदयपूर, अमरावती, जम्मू काश्मीर येथे घडलेल्या प्रकाराबाबत भाजपकडे कोणतेच उत्तर नाही, असेही चरणसिंग सप्रा म्हणाले.
काल शनिवारी पणजीतील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चरणसिंग सप्रा बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार संकल्प आमोणकर, ऍड. श्रीनिवास खलप व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आरोपींना भाजपचा आसरा
उदयपूरच्या कन्हैयालाल हत्याकांडातील मुख्य आरोपी रियझ अन्सारी हा भाजपचा अल्पसंख्याक मोर्चाचा पदाधिकारी असल्याचे आढळून आले आहे. अमरावती हत्याकांडातील फरार असलेला मुख्य आरोपी इर्फान शेख हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. भाजपनेच याना आसरा दिला आहे. एनआयए त्यांचा तपास का करीत नाही असा प्रश्न चरणसिंग सप्रा यांनी उपस्थित केला.
भाजपचे पदाधिकारीच आतंकवादी
गेल्या आठवडय़ात एलइटीचा आतंकवादी तालिब हुसैन याला काश्मीरमध्ये पकडण्यात आले. तो श्रीनगरमधील भाजपच्या आयटी विभागाचा प्रमुख होता. अमरनाथ यात्रेकरूना मारण्यासाठी एलईटीची योजना आखल्याची कबुली तालिबने दिली आहे. याबाबत भाजपा काहीच का बोलत नाही. 1 मे 2020 रोजी तारिक अहमद मीरला सीआरपीएफ पोलिसांनी डीसीपी दविंदर सिंग यांच्यासह अटक केली होती. तारिक अहमद मीर हा हिजबुल मुजाहिद्दीना अग्निशस्त्रांची व्यवस्था करत होते. तारिक अहमद मीर हा भाजपचा पदाधिकारी होता. दविंदर सिंग आणि तारिक अहमद मीर हे दोघेही आतंकवाद्यासाठी काम केल्याचे एनआयएन दाखल केलेल्या आरोपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. दविंदर सिंग विरोधातील चौकशी का रखडली असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे चरणसिंग सप्रा यांनी म्हटले आहे.
2017 साली आतंकवाद्यांना महत्त्वाची माहिती पुरविल्याबद्दल मध्यप्रदेश एटीएसने भाजप आयटी विभाग सदस्य ध्रुव सक्सेनाला अटक केली होती. 2019 साली बजरंग दलाचा नेता बलराम सिंग याला अटक करण्यात आली होती. बलराम सिंग हा आतंकवाद्यांना निधी पुरवित होता. आतंकवाद्यांना निधी पुरविणे आणि लॉजिस्टीकची व्यवस्था करणे याबाबत भाजपाचे पदाधिकारी निरंजन हिजोई याला एनआयए न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. आतंकवादी अझर मसूद याला आश्रय देणाऱया मोहम्मद फारुख खान याने श्रीनगरमधील प्रभाग क्रमांक 33 मधून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मोहम्मद फारूख खान हा जे. के. एल. एफ आणि हरकत उल मुज्जाहिद्दीन या आतंकवादी संघटनेचा माजी सदस्य असल्याचे चरणसिंग सप्रा म्हणाले.
भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख रुबल जोनू शेख याला मुंबई गुन्हा विभागाच्या शाखेने 19 फेब्रुवारी 2021 रोजी अटक केली होती. तो बांगलादेशी स्थलांतरीत होता. बांगलादेशातील लोकांना तो बेकायदेशीररित्या भारतात आणत होता. अफजलगुरुला देशभक्त मानणाऱया मेहबुबा मुफ्ती हिला भाजपने मुख्यमंत्री केले. तसेच तिने जाहिरपणे पाकिस्तान, फुटीरवादी आणि आतंकवाद्यांचे आभार मानले होते. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांचे तोंड गप्प का होते. आंतकवादी मसरत आलमची सुटका का करण्यात आली असा प्रश्न चरणसिंग सप्रा यांनी उपस्थित केला आहे. लोकांवर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱयांचे खटले मागे घेण्यात आले आणि मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पठाणकोटमध्ये मोदी सरकारने आयएसआचे रेड कार्पेट घालून स्वागत का केले, असे अनेक प्रश्न सप्रा यांनी उपस्थित केले आहेत.
वरील सर्व मुद्दे पाहिल्यास भाजपा विकासासाठी काम करीत नसून जातीय तडे निर्माण करून देशात अशांतता निर्माण करून राष्ट्राचा विद्ध्वंस करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना जातीय विभाजन आणि शत्रूत्वाचे भांडे उकळत ठेवायचे आहे ते देशविरोधी घटकांना कामावर ठेवू शकतात. अतिरेक्यांना पक्षीय पदे आणि संरक्षण देऊन त्यांचे रक्षण करू शकतात. शक्ती आणि मनीपॉवरचा प्रचंड प्रमाणात गैरवापर होत आहे, असेही चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.